डावे केवळ नावापुरतेच उरले असून काँग्रेसने आता फक्त पोटनिवडणुकाच लढवाव्यात, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षाला टोला लगावला. त्रिपुरा आणि नागालँडमधील विधानसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या विजयानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपा प्रदेश कार्यालयात कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस आणि डाव्यांवर जोरदार हल्ला चढविला.
''एखाद्या पोटनिवडणुकीत पराभव झाल्यानंतर थेट पंतप्रधानांवर टीका करणाऱ्यांच्या डोळ्यात या तीन राज्यांतील विजयाने झणझणीत अंजन घातलं आहे. हा नुसताच ट्रेलर आहे. लवकरच होऊ घातलेल्या कर्नाटकमधील निवडणुकीतही भाजपचंच सरकार येणार अाहे'', असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.
''पूर्वेकडील राज्यातही लाल सूर्य मावळला आहे. त्यामुळे भाजपाचा अभूतपूर्वच, नव्हे तर ऐतिहासिक विजय झाला आहे. सुनील देवधर यांनी दोन वर्षे त्रिपुरात संघर्ष केला. त्याचंच हे फळ आहे'', असं म्हणत पूर्वेकडील राज्यात भाजपाच्या विजयाचे शिल्पकार असलेल्या सुनील देवधर यांचंही फडणवीस यांनी कौतुक केलं.
'रिव्हर मार्च'चा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर फडणवीसांवर विरोधकांनी जोरदार टीका केली. त्यामुळे रविवारी झालेल्या 'रिव्हर मार्च'च्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री गेले नाहीत. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. 'मी त्या कार्यक्रमाला जाणारच नव्हतो. आरोप करणारे लोक फस्ट्रेटेड आहेत, अशांना काय उत्तर द्यायचं,' असा सवालही त्यांनी केला.