राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेले आरोप गंभीर आहेत, असं म्हटलं.
ज्युलिओ रिबेरो सारख्या एखाद्या उत्तम अधिकाऱ्यामार्फत चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली आहे.
शरद पवारांनी उदाहारण दिलेले ज्युलिओ रिबेरो नक्की कोण हे जाणून घेऊयात.
कोण आहेत ज्युलिओ रिबेरो?
ज्युलिओ रिबेरो १९५३ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. मुंबईचे २१ वे पोलीस आयुक्त म्हणून त्यांनी १९८२ ते १९८६ या काळात काम पाहिलं होतं. रिबेरो हे सीआरपीएफचे डिजीही होते. शिवाय गुजरातचे पोलीस महासंचालक म्हणून त्यांनी काम पाहिलंय. १९८९ साली ते पोलीस दलातून निवृत्त झाले. रिबेरो यांना पदमभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय.
पंजाबचा असंतोष मोडून काढणारे पोलीस अधिकारी
ज्युलिओ रिबेरो हे 1982-86 दरम्यान मुंबईचे पोलीस आयुक्त होते. आयुक्तपदानंतर केंद्रात CRPF चे महासंचालक होते. काही काळ गुजरातचे पोलीस महासंचालक म्हणून त्यांनी काम केलं आहे. पंजाबमधला असंतोष मोडून काढणारे पोलीस अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयात काम
ज्युलिओ रिबेरो यांनी केंद्रीय गृहमंत्रालयात विशेष गृहसचिव म्हणून काम केलं आहे. पंजाब सरकारचे सल्लागार म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. १९८९-८३ पर्यंत रोमानियात भारताचे राजदूत म्हणून रिबेरो यांनी काम केलं. १९८७ साली रिबेरो यांचा पद्मभूषण पुरस्कारानं गौरव करण्यात आला.
’बुलेट फॉर बुलेट’ हे रिबेरो यांचे आत्मचरित्र देखील प्रसिद्ध झाले. त्यांचं सध्याचं वय ९१ वर्ष आहे. रिबेरो यांचा जन्म ५ मे १९२९ रोजी झाला होता.
ज्युलिओ रिबेरोंवर प्राणघातक हल्ले
१९८६ मध्ये ज्युलिओ रिबेरो यांच्यावर ६ शिखांकडून पोलीस गणवेशात मुख्यालयातच हल्ला झाला होता. ६ शिख व्यक्तींनी केलेल्या हल्ल्यात गार्ड ठार झाले होते. तर रिबेरो यांच्यासह पत्नी, ४ सुरक्षा कर्मचारी जखमी झाले होते. सहाही हल्लेखोर हल्ल्यानंतर ट्रकमधून पसार झाले होते. खलिस्तान कमांडोनं रिबेरोंवरील हल्ल्याची जबाबदारी घेतली होती.
१९९१ मध्ये शीख हल्लेखोराकडून रोमानियाची राजधानी बुचारेस्टमध्ये रिबेरो यांच्यावर हल्ला झाला होता.