'महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भविष्यातील सर्व निवडणुका लढवणार असून त्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमानं काम करावं', असं आवाहन महाराष्ट्र स्वाभिमानी (मस्वाप) पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी केलं आहे. शुक्रवारी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात पार पडलेल्या मस्वापचा मुंबई विभागीय मेळाव्यात ते बोलत होते.
'नुसत्या निवडणुका लढवून गप्प न बसता मस्वाप आता जनतेचे जिव्हाळ्याचे प्रश्न घेऊन आंदोलनंही करेल', असंही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी पक्षाच्या मुंबई अध्यक्षपदी राजेश हाटले यांची नियुक्ती केली. तसेच पक्षाकडून मुंबई पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवत असलेल्या राजू बंडगर यांना निवडून आणण्याचं आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केलं.
'पक्षाच्या स्थापनेनंतर मुंबईत मेळावा झाला नव्हता. काही राजकीय कारणामुळे हा मेळावा घेता आला नाही. मुंबईला देशात राजकीय आर्थिक महत्त्व आहे. या शहरात ताकद मिळवली पाहिजे' असंही ते म्हणाले.
यावेळी त्यांनी शिवसेनेवर चांगलंच टिकास्त्र सोडलं. 'शिवसेना मराठी माणसांची नाही. जर ती मराठी माणसांची असती तर मराठी माणसाला आज मुंबईत नोकरी, घर आणि गिरण्यांचा प्रश्न सुटला असता. मराठी माणसांनी शिवसेनेला खूप काही दिलं. हिंदुत्वाच्या नावावर शिवसनेंन राजकारण केलं. मराठी लोकांची टक्केवारी मुंबईत कमी होत चालली आहे.
मला जे डीवचतील त्यांना मी पुरून उरेन आज भाजपसोबत असून आम्ही एकटे लढू सांगून सतत सर्व फायदे लुटायची कामं शिवसेनेनं केली आहेत. आता मुंबईत स्वाभिमान पक्षाची आंदोलनं सुरू होतील'. त्यामुळे येत्या निवडणुकीत स्वाभिमानी पक्ष मुंबईत आपली ताकद दाखवणार असल्याचं स्पष्ट होत आहे.