महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पाणी पोहोचवून जलक्रांती घडवू, पाण्याचा विनियोग चांगल्या पद्धतीने करावा लागेल, हाच जलसाक्षरतेचा अर्थ आहे. शरीरात जसे रक्तवाहिन्यांचे जाळे असते. त्याच पद्धतीने महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात पाणी पोहोचविण्याची गरज आहे. त्यासाठी आपल्याला अतिरिक्त ठरणारे, वाहून जाणारे पाणी थांबवावे लागेल. ते वळवावे लागेल. त्यातून जलक्रांती होईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
कै.डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त जलसंपदा, जलसंधारण व पाणी पुरवठा क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्यांना देण्यात येणाऱ्या डॉ.शंकररावजी चव्हाण जलभूषण पुरस्कार वितरण प्रसंगी सह्याद्री अतिथीगृह येथे ते बोलत होते.
या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री अशोक चव्हाण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, मृद व जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे उपस्थित होते.
हेही वाचा- मुंबई, ठाणे आणि पालघरला येलो अलर्ट
उत्कृष्ट नियोजनाची दूरदृष्टी असलेले दिवंगत डॉ.शंकरराव चव्हाण हे आधुनिक भगीरथ म्हणून ओळखले जातात. त्यांच्या 101व्या जयंतीनिमित्त आपण जलसंपदा विभागामार्फत हे पुरस्कार देत आहोत. जलसाक्षरता आणि पाण्याचे नियोजन यासाठी जलभूषण पुरस्कार विजेत्यांनी केलेले काम पुढे अनेकांपर्यंत पोहोचावे, त्यातून जलसाक्षरता निर्माण व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
दिवंगत शंकरराव चव्हाण यांच्या शिस्तीचा चांगला परिणाम आज आपण अनुभवतो आहोत. कितीही मोठे शोध लागले, विकास झाला, तरी पाणी निर्मितीचे तंत्रज्ञान विकसित होऊ शकलेले नाही. जे काही पाणी आपल्याकडे उपलब्ध आहे, त्याचे नियोजन करावेच लागेल. शेती पावसाच्या पाण्यावरच अवलंबून आहे. एकीकडे पाणी कधी मरणोन्मुख माणसाला वाचवते. पण पूर आला, तर तेच पाणी बुडवून टाकते. त्यामुळे पाण्याचे नियोजन हे महत्त्वाचे आहे. हेच नियोजन दिवंगत शंकररावजी यांनी त्या काळी दूरदृष्टीकोनातून केले. त्यांनी जायकवाडी धरणाच्या माध्यमातून एक दिशा दिली. त्यासाठी पाऊलही टाकले.