राम मंदिराची उभारणी शिवसेनेच्या ताकदीशिवाय होऊ शकत नाही, असं म्हणत रामजन्मभूमी मंदिर निर्माण न्यासाचे अध्यक्ष जन्मेजयशरण जी महाराज यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना आयोध्या वारीचं निमंत्रण दिलं आहे. तर उद्धव ठाकरे यांनी हे निमंत्रण स्वीकारल्याचं समजत असून दसऱ्यानंतर उद्धव ठाकरे अयोध्येला जाण्याची शक्यता आहे.
जन्मेजयशरण जी महाराज यांच्या या निमंत्रणामुळे आणि उद्धव ठाकरे यांनी हे निमंत्रण स्वीकारल्याने आता राजकीय वर्तुळात एक वेगळीच चर्चा रंगली आहे. ती म्हणजे भाजपवर नाराज असलेल्या शिवसेनेला भाजपला कोंडीत पकडण्याची ही आयती संधी मिळाली आहे का?
जन्मेजयशरण जी महाराज यांनी बुधवारी शिवसेना भवन इथं उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यानी उद्धव ठाकरे यांना अयोध्येला येण्याचं निमंत्रणही दिलं. राम मंदिराच्या नावावर भाजपा सत्तेत आली, पण याच राम मंदिराचा विसर भाजपला पडला आहे. चार वर्षात राम मंदिरसाठी भाजपनं काहीही केलं नाही, अशी टीका नेहमीच उद्धव ठाकरे करतात.
तर काही दिवसांपूर्वीच एका पोस्टरबाजीद्वारे शिवसेनेने राम मंदिराचा मुद्दा उचलत चलो अयोध्या अशी हाक देत अयोध्या वारीचे संकेत दिले होते. असं असताना जन्मेजय शरण जी महाराज यांनी निमंत्रण देणं, राम मंदिर उभारणी शिवसेनेशिवाय होऊ शकत नाही असं म्हणणं शिवसेनेसाठी महत्त्वाची बाब मानली जात आहे.