Advertisement

‘विनाकारण त्रास’ असा प्रकार सुरू असेल तर… शिवसेनेचा इशारा

एका पत्रामुळे महाराष्ट्रात राजकीय परिवर्तनाची नवी चाहूल लागली असं काहींना वाटत आहे. ते सर्व लोक राजकारणातील कच्चे लिंबूच म्हणायला हवेत.

‘विनाकारण त्रास’ असा प्रकार सुरू असेल तर… शिवसेनेचा इशारा
SHARES

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्रानंतर तपास यंत्रणांचा गैरवापर करून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांना नाहक त्रास देण्यात येत असल्याचे आरोप-प्रत्यारोप राज्यात सुरू आहे. या विनाकारण त्रासावर भूमिका मांडतानाच शिवसेनेने पंतप्रधान मोदी यांच्याकडे केंद्रीय तपास यंत्रणांच्या विनाकारण त्रास प्रकरणावर दाद मागता येईल, असं म्हटलं आहे. सोबतच सत्तेचा गैरवापर आणि बलप्रयोग हे कायमस्वरूपी नसतं. अर्जुनासारखं लढायचं, असं म्हणत स्वपक्षातील आमदारांना उपदेश देखील दिला आहे.

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनातून भूमिका मांडताना नमूद केलं आहे की, केंद्रीय तपास यंत्रणांचा विनाकारण त्रास होत आहे. त्रास टाळायचा असेल तर भाजपशी किंवा थेट मोदींशी जुळवून घ्या, अशा आशयाचं एक पत्र शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना लिहिले आहे. सरनाईक यांनी त्यांच्या पत्रात इतर बरेच विषय मांडले आहेत. ते त्यांचं वैयक्तिक मत असेल. एका आमदाराने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं यावर प्रतिक्रिया द्यावी असं खास काहीच नाही, पण या पत्रामुळे महाराष्ट्रात राजकीय परिवर्तनाची नवी चाहूल लागली असं काहींना वाटत आहे. ते सर्व लोक राजकारणातील कच्चे लिंबूच म्हणायला हवेत. 

सरनाईकांच्या पत्राचा ताजा कलम इतकाच आहे की, महाराष्ट्रात भाजपने (bjp) सत्ता गमावली या चिडीतून महाविकास आघाडीच्या आमदारांना विनाकारण त्रास दिला जात आहे. आपल्याला आणि आपल्या कुटुंबीयांना नाहक त्रास दिला जात आहे. एका केसमध्ये जामीन मिळाला की तत्काळ दुसऱ्या केसमध्ये जाणीवपूर्वक गुंतवलं जात आहे, असेही सरनाईक यांनी या पत्रात म्हटले आहे. त्यांच्या या संपूर्ण पत्रातील ‘विनाकारण त्रास’ हाच शब्द व त्यामागच्या भावना महत्त्वाच्या आहेत. सीबीआय, ईडी, आयकर, एनआयए या केंद्रीय तपास यंत्रणांचा राजकीय कामांसाठी वापर होत आहे.

महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचं (shiv sena) सरकार आहे व तीनही पक्षांना हे विनाकारण त्रास देण्याचे उपद्व्याप सुरू झाले आहेत. आता या अन्यायाविरुद्ध मर्दासारखे लढत राहायचे की हाती शस्त्र असूनही गुडघे टेकून शरण जायचे याचा विचार शिवरायांचे मावळे समजणाऱया प्रत्येकाने करायलाच हवा. बरे-वाईट दिवस येतच असतात. वाईट दिवसही निघून जातात. सत्तेचा गैरवापर आणि बलप्रयोग हे कायमस्वरूपी नसते. अर्जुनासारखे लढायचे, शिवाजी महाराजांसारखे शत्रूवर चाल करून जायचे की शत्रूशी ‘तह’ करून मांडलिकी पद्धतीने गुजराण करायची? असा प्रश्न स्वपक्षीय आमदारांना विचारला आहे.

हेही वाचा- “हे सरकार ५ वर्षे काय २५ वर्षे टिकेल”

शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करा नाहीतर परिणामांस सामोरे जा, अशा दाबदबावाला बळी न जाता शिवसेनाप्रमुखांनी स्वाभिमानाने शिवसेनेचं अस्तित्व टिकवून ठेवलं. म्हणून आजची शिवसेना तेजाने तळपताना दिसत आहे. ही शिवसेना निखारा म्हणून शिवसेनाप्रमुखांनी जतन करून ठेवली. म्हणून आजही सामान्यातल्या सामान्य तरुणांना आमदारकी, खासदारकी आणि मंत्रीपदे भोगता आली. कोणत्याही त्रासाची, छळाची, न्याय-अन्यायाची पर्वा न करता लढत राहाणारा शिवसैनिक हेच शिवसेनेचं ‘बळ’ आहे. 

महाराष्ट्रातलं राजकारण आज एका वेगळ्या वळणावर येऊन पोहोचले आहे. हे वळण स्वाभिमानाचं आहे. राज्याच्या महाविकास आघाडीतील तीनही पक्ष सरकार चालवताना एकमेकांचा मान-सन्मान, स्वाभिमान जपत पुढे जात आहेत. महाराष्ट्राच्या जनतेने हा प्रयोग स्वीकारला आहे. देशाला राष्ट्रीय पातळीवर याच प्रयोगाची प्रतीक्षा आहे. पंतप्रधान मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांचे स्थान संसदीय लोकशाही व्यवस्थेत सर्वोच्च आहे. महाराष्ट्र सरकारने पंतप्रधानांशी जुळवून घेतलंच आहे. मुळात ‘वाकडे-तिकडं’ काही नव्हतंच तर जुळवून घ्यायचा विषय येतोच कोठे? 

तरीही ‘विनाकारण त्रास’ असा काही नाहक प्रकार सुरू असेल तर पंतप्रधान मोदी यांच्याकडे केंद्रीय तपास यंत्रणांच्या विनाकारण त्रास प्रकरणावर दाद मागता येईल किंवा सरनाईकांचं पत्र जसंच्या तसं त्यांच्या माहितीसाठी पाठवता येईल. आमच्या लेखाचाही ताजा कलम इतकाच आहे की, शिवसेना आमदारांच्या पत्राची क्रिया-प्रतिक्रिया संपली असेल तर पुढच्या कामास लागूया!, असं म्हणत या विषयाला फारसं महत्त्व न देण्याचं सुचवलं आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा