शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ईडीसंदर्भात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. १३ पानांचं पत्र लिहिलं असून मंगळवारी हे पत्र पंतप्रधानांना देणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं. तसंच, या पत्रावरून केंद्रीय तपास यंत्रणा भ्रष्टाचाराने किती पोखरल्या आहेत हे समजणार असल्याचंही राऊत यांनी म्हटलं. त्यामुळं या पत्रातून नेमकं काय उलघडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी आपण ईडीसंदर्भात पंतप्रधानांना १३ पानी पत्र लिहिलं असल्याची माहिती दिली. ‘’जे सत्य आहे, जो अन्याय आहे त्याला टार्गेट म्हणू नका. समोरच्या काही प्रमुख लोकांचे भ्रष्टाचार आणि घोटाळे समोर आणले जात आहेत. काही विशिष्ट लोक आमच्यावर हल्ले करतात आणि त्याचवेळी मोठे घोटाळे करुन नामनिराळे राहतात. त्यांचे मुखवटे फाडले पाहिजेत’’ असंही संजय राऊत यांनी म्हटलं.
“ईडी संदर्भात मी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे १३ पानांचे पुराव्यासह पत्र दिलं आहे. अनेक पत्रकारांनी ते पत्र मीडियासमोर, देशासमोर ठेवण्याची विनंती केली आहे. ते पत्र मी आज देणार आहे. त्या पत्रावरुन केंद्रीय तपास यंत्रणा भ्रष्टाचाराने किती पोखरल्या आहेत, कोणाच्या नियंत्रणाखाली काम करतात आणि राजकीय विरोधकांची कोंडी करुन, अडचणीत आणून भाजपाच्या राजकारणाला हातभार लावतात हे सगळं आहे. हे टप्पयाटप्याने बाहेर येईल. आज पहिला भाग बाहेर काढत आहे,” असा इशारा संजय राऊतांनी दिला आहे.
दरम्यान, संजय राऊत मंगळवारी पुन्हा पत्रकार परिषद घेत असून यावेळी ते काय नवा गौप्यस्फोट करणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. यावेळीही संजय राऊत यांनी शिवसेना भवनातच पत्रकार परिषद घेणार असून वेळदेखील दुपारी ४ ची आहे. संजय राऊत यावेळी पुन्हा एकदा भाजपा नेत्यांवर निशाणा साधणार असून भ्रष्टाचारी भाजपा नेत्यांचे मुखवटे उघडे पाडण्याचा इशारा दिला आहे.