उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या मनोमिलनाच्या चर्चा जोरात आहेत. दोन्ही ठाकरे बंधूंनी याबद्दल सकारात्मक विधानं केली आहेत. याबद्दल प्रश्न विचारला असता, संदेश कशाला, थेट बातमीच देतो, असं 'मनसे' उत्तर उद्धव ठाकरेंनी आज दिलं.
त्यामुळे ठाकरेंच्या मनोमिलनाच्या चर्चेनं आणखी वेग घेतला. राजकारणात काहीही घडू शकतं, असं म्हणतात. 2019 पासून महाराष्ट्रानं (maharashtra) हे पाहिलं आहे. 2014 आणि 2017 मध्ये दोन्ही पक्षांची युती होईल असं वाटत होतं. पण ऐनवेळी चर्चा फिस्कटली. पण आता ठाकरे ब्रँड संकटात आहे. दोन्ही भावांना कधी नव्हे इतकी आता एकमेकांची गरज आहे.
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची धूळधाण उडाली. ठाकरेंची शिवसेना, पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसला 50 चा आकडादेखील गाठता आला नाही. तेव्हापासून तिन्ही पक्षांची एकजूट फारशी दिसलेली नाही.
उद्धव ठाकरे (uddhav thackeray) हे राज यांच्यासोबत युती (alliance) करतील, अशी शंका काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आहे. तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील आणि आपल्या हातावर तुरी देतील, असा संशय काँग्रेस आणि ठाकरेंना वाटतो.
महाविकास आघाडीचे शिल्पकार असलेले शरद पवारच बाहेर पडले, तर त्या आघाडीला अर्थच राहत नाही. त्यामुळे मविआची स्थिती वाईट आहे.
दुसरीकडे विधानसभेला सुसाट कामगिरी करणाऱ्या महायुतीत (mahayuti) वर्चस्वाचं राजकारण सुरु आहे. सत्ता असल्यानं जोरदार इनकमिंग तिन्ही पक्षांत सुरु आहे. त्यातून एकमेकांना शह दिला जात आहे. भाजपबद्दल एकनाथ शिंदे यांच्या मनात साशंकता आहे.
माजी मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे (eknath shinde) सध्या उद्धव आणि राज यांच्या युतीच्या चर्चांकडे डोळे लावून बसलेले आहेत. कारण दोन ठाकरे एकत्र आल्यास त्याचा सर्वाधिक फटका शिंदे यांनाच बसेल. त्यामुळेच राज ठाकरे यांच्याकडे आपल्या निकटवर्तीयांना अधूनमधून पाठवत शिंदे यांना संवादाचा मार्ग खुला ठेवला आहे.
मनसेसोबत युती हवी असेल, तर काँग्रेसची साथ सोडा, अशी अट राज यांनी उद्धवसेनेसमोर ठेवली असल्याचं म्हणतात. याचा अर्थ भावाची साथ हवी असल्यास उद्धव यांना काँग्रेसचा हात सोडावा लागेल. काँग्रेसमुळे मुस्लिम मतदार मोठ्या संख्येनं शिवसेनेकडे वळले.
महाराष्ट्र टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या दोन निवडणुकांमध्ये त्यांनी उद्धव यांच्या उमेदवारांना भरभरुन मतंही दिली. काँग्रेसची साथ सोडल्यास ती मतं हातून जाण्याची भीती आहे. ते नुकसान राज ठाकरेंना सोबत घेतल्यानं भरुन निघणार का, याचं गणित मातोश्रीवर मांडलं जात आहे.
राज आणि उद्धव ठाकरे सोबत आल्यास भाजपला फटका बसणार नाही, असं पक्षाचा अंतर्गत सर्व्हे सांगतो. हा अंतर्गत सर्व्हे बाहेर येण्याचं टाईमिंग महत्त्वाचं आहे. ठाकरेंची मुंबईत युती झाल्यास त्याचा सर्वाधिक फटका शिंदे यांना बसेल.
राज ठाकरे यांचं वत्कृत्त्व आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे असलेलं संघटन, दोन्ही ठाकरे सोबत आल्यानं निर्माण होणारी भावनिक लाट याचा सर्वाधिक फटका एकनाथ शिंदे यांना बसू शकतो.
एकनाथ शिंदे यांना धक्का द्यायचा असल्यास मातोश्री-शिवतीर्थ यांच्या मनोमिलनाला भाजपकडून हवा दिली जाईल. त्यामुळेच सध्या शिंदेसेनेत अस्वस्थता आहे.
हेही वाचा