Advertisement

भारतात अशी झाली पहिली निवडणूक, निवडणुकीसाठी लागले ५ महिने

महिलांकडून मतदान करून घेणं ही त्यावेळची सर्वात मोठी कामगिरी होती. कारण स्त्रिया आपलं नाव सांगत नव्हत्या. अमुक याची मुलगी, बायको किंवा आई असाच परिचय बायका करून देत होत्या. जेव्हा मुख्य आयुक्तांकडे ही यादी आली तेव्हा त्यांना धक्काच बसला.

भारतात अशी झाली पहिली निवडणूक, निवडणुकीसाठी लागले ५ महिने
SHARES

देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. अवघ्या काही दिवसांवर निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे सर्व राजकीय पक्ष प्रचारांमध्ये व्यस्त आहेत. भारतात होणाऱ्या प्रत्येक निवडणुका तशा चांगल्याच गाजल्या आहेत. पण भारतातील पहिली सार्वत्रिक निवडणूक ऐतिहासिक ठरली. कारण तब्बल पाच महिने ही निवडणूक चालली. त्यावेळी बहुतांश नागरिकांना निवडणुका काय असतात हेच माहीत नव्हतं.

भारत नुकताच इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला होता. त्यामुळे नवीन राज्यपद्धती समजून घेण्यास भारतीयांना थोडं कठीण जात होतं. याचं सर्वात मोठं कारण हे होतं की त्यावेळी निरक्षरतेचं प्रमाण अधिक होतं. अशा परिस्थितीत निवडणुका नेमक्या कशा पार पडल्या? मतदान कसं करण्यात आलं? त्यावेळी कोणत्या समस्यांचा सामना करावा लागला? हे जाणून घ्यायला कुणाला नाही आवडणार. तर जाणून घेऊयात पहिल्या निवडणुकीच्या रंजक गोष्टी.


१) भारत १५ ऑगस्ट १९४७ साली स्वतंत्र झाला. भारताच्या हजारो वर्षांच्या संस्कृतीमध्ये लोकशाही असल्यानं भारत लोकशाही स्वीकारायला तयार झाला. त्यामुळे दोन वर्षांनी म्हणजेच १९५० साली निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली. भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून सुकुमार जैन यांची निवड करण्यात आली.

२) निवडणुका घेण्याचा निर्णय सोपा नव्हता. कारण यासाठी प्रत्येक भारतियाची नोंद असणं आवश्यक होतं. त्यासाठी घरी जाऊन प्रत्येकाची नोंद करण्यात आली. त्यावेळी संपूर्ण भारतात १७ कोटी ६० लाख मतदारांची नोंद करण्यात निवडणूक आयोगाला यश आलं होतं.


३) महिलांकडून मतदान करून घेणं ही त्यावेळची सर्वात मोठी कामगिरी होती. कारण स्त्रिया आपलं नाव सांगत नव्हत्या. अमुक याची मुलगी, बायको किंवा आई असाच परिचय बायका करून देत होत्या. जेव्हा मुख्य आयुक्तांकडे ही यादी आली तेव्हा त्यांना धक्काच बसला. कारण जवळपास २८ लाख स्त्रियांची नावं त्यात होती.


४) त्याकाळात पाश्चिमात्य देशात सुरुवातीला फक्त श्रीमंतांना मतदानाचा अधिकार होता. पण भारतानं लोकशाही मार्ग निवडला. आर्थिक अटींचा विचार न करता वयाच्या अटीचा समावेश केला. यात २१ वर्ष वय असलेल्या व्यक्तीला मतदानाचा अधिकार दिला.


५) १५ ऑक्टोबर १९५१ ते २१ फेब्रुवारी १९५२ म्हणजेच जवळपास ५ महिने निवडणूक सुरू होती. एकूण १ हजार ८७४ उमेदवार निवडणुकीत होते. पण मतदानास पात्र असलेल्या मतदारांची संख्या १७.३ कोटी होती. आज हा आकडा ९० कोटींच्या वर आहे.

६) त्याकाळी निरक्षरतेचं प्रमाण अधिक होतं. नागरिकांना पक्षाची नावं वाचता येत नव्हती. मग मतदान कसं करणार? यावर उपाय म्हणून पक्ष चिन्हाची कल्पना काढण्यात आली. प्रत्येक राजकीय पक्षाची ओळख त्याच्या चिन्हावरून कळू लागली. सुरुवातीला काँग्रेस पक्षानं बैलाचं चिन्ह निवडलं होतं. तर फॉरवर्ड ब्लॉक पक्षानं हाताचा पंजा चिन्ह म्हणून निवडलं.


७) सध्याच्या घडीला मतदान करायचं तर तुमच्या जवळ मतदान केंद्र उभारण्यात येतं. पण त्याकाळी मतदान केंद्र दूर असायची. त्यामुळे सायकल, पायी किंवा बैलगाडीचा वापर करावा लागत असे.

८) त्याकाळी भिंतींवर, जनावरांच्या पाठीवर राजकीय पक्षांच्या घोषणांचे पोस्टर चिटकवले जायचे. चित्रपटगृहात निवडणुकीसंदर्भात माहितीपट दाखवले जात होते. नेत्यांनी घराघरात पोचत प्रचार केला होता.


९) त्याकाळी मतदारांना मत देणं सोपं जावं म्हणून प्रत्येक पक्षासाठी वेगळी पेटी ठेवण्यात आली होती. या पेटीवर पक्ष चिन्ह आणि उमेदवाराचं नाव लिहिण्यात आलं होतं. मतदारांना एक मतपत्रिका दिली जायची. ही मतपत्रिका आपल्या आवडत्या पक्षाच्या मतपेटीत टाकली जायची.


१०) गोदरेज कंपनीतर्फे वेगळ्या डिझाईन केलेल्या मतदान पेट्या भारताच्या पहिल्या निवडणुकीसाठी तयार करण्यात आल्या होत्या. पेट्या बुलेटप्रुफ तर होत्याच, शिवाय छेडछाड केली तरी न उघडणाऱ्या होत्या. या पेट्यांसाठी ८ हजार २०० टन स्टिलचा वापर करण्यात आला होता.




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा