ठाण्याचा जय शिव अाणि सांगलीच्या न्यू उत्कर्ष संघाने अापापल्या गटात सलग दुसरा विजय मिळवून स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या अमृत महोत्सवानिमित्त अायोजित राज्यस्तरीय ज्युनियर कबड्डी स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. प्रभादेवीतील चवन्नी गल्ली येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत जय शिवने यंग प्रभादेवीचा ३३-१९ असा पाडाव केला. न्यू उत्कर्षने उपनगरच्या स्वस्तिक संघाला ३४-२९ असे अाणि त्यानंतर मुंबई शहरच्या अोम ज्ञानदीपला ४४-३१ असे पराभूत करून विजयी घोडदौड कायम राखली.
न्यू उत्कर्षने स्वस्तिकवर विजय मिळविताना मध्यंतराला १६-९ अशी आघाडी घेताना लोन चढविला. प्रशांत बनसोडे आणि महेंद्र कर्णिकार यांनी भेदक चढाया केल्या. स्वस्तिकने त्यांना उत्तरार्धात चोख उत्तर दिले. सूरज मोरे, तनिष देशमुख यांच्या चढाया आणि सिद्धेश पांचाळ, अलंकार पाटील यांच्या पकडीच्या बळावर बाजी उलटवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचे प्रयत्न संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत.
रत्नागिरीच्या वाघजाई संघाने आपली छाप पाडताना दोन्ही प्रतिस्पर्ध्यांना सहज लोळविले. त्यांनी प्रथम संघर्षचा ६०-२७ आणि नंतर सिद्धी प्रभाचा ५१-२२ असा पराभव केला. या विजयामध्ये त्यांचे शुभम शिंदे अजिंक्य पवार, साईराज कुंभार आणि ओमकार कुंभार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.