'विनाहेल्मेट मोटरसायकल चालवू नका’, असं वारंवार वाहतूक पोलिसांकडून चालकांना सांगितलं जातं. तरीसुद्धा अनेकजण आरटीओचे नियम मोडून विनाहेल्मेट मोटरसायकल चालवत असतात. अशा चालकांवर मुंबईसह राज्यभरात जानेवारी ते एप्रिल या कालावधीत ३ लाख ३९ हजार ९८२ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. मुंबईत या कालावधीत १ लाख ४१ हजार ७३० मोटरसायकल चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. तसंच, राज्यात या प्रकरणांमध्ये ८ कोटी ३२ लाख रुपयांची दंडवसूली करण्यात आली आहे. सह्याद्री राज्य अतिथीगृह इथं सोमवारी झालेल्या रस्ता सुरक्षा परिषदेच्या बैठकीत परिवहन आयुक्तालयामार्फत माहिती देण्यात आली.
विनाहेल्मेट मोटरसायकल चालविणाऱ्या चालकांविरुद्ध कारवाईचं प्रमाण वाढलं आहे,
हे स्वागतार्ह असलं तरी हेल्मेटचा वापर करण्याबाबत लोकांचं प्रबोधन होणं गरजेचं आहे,
असं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी या बैठकीत स्पष्ट केलं.
त्याशिवाय
शासनानं कोणत्याही प्रकारची हेल्मेटसक्ती केली नसून,
हेल्मेट वापराच्या नियमाची फक्त अंमलबजावणी केली जात आहे,
असंही रावते यांनी म्हटलं.
दर ५ वर्षांनी वाहनचालकांना ८ दिवसांचं वाहतुकीचं अद्ययावत प्रशिक्षण देणं तसंच, वाहतुकीविषयी विविध प्रश्नांवर संशोधन करणं आदींसाठी राज्य शासनाची स्वतंत्र 'वाहन संशोधन आणि प्रशिक्षण संस्था' सुरू करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात यावा, अशा सूचना या बैठकीत देण्यात आल्या.
मुंबई ते नागपूर दरम्यान होत असलेल्या समृद्धी महामार्गावर रस्ते सुरक्षेच्या दृष्टीनं उपाययोजनांची अंमलबजावणी रस्ते बांधकामाच्या वेळीच होणं गरजेचं आहे.
या महामार्गासाठी जी अधिकची वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
त्यानुसार,
आपल्या वाहनांचं आणि त्यांच्या टायर्सची रचना आहे का,
याचा विचार व्हावा,
अशी सूचनाही रावते यांनी केली.
यासाठी वाहन उत्पादक आणि टायर उत्पादक कंपन्यांसमवेत बैठक घेऊन चर्चा करावी.
राज्यात बरेच अपघात हे टायर फुटून किंवा ते पंक्चर झाल्यानं होतात.
त्यामुळं टायर तपासणीची काही यंत्रणा आपल्याकडं सुरु करता येईल का? याचाही अभ्यास करण्यात यावा,
अशी सूचनाही त्यांनी परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना यावेळी दिली.
मुंबई शहरात बेदरकार मोटरसायकल चालविण्याचं प्रमाण तरुणांमध्ये वाढत आहे. याशिवाय रात्रीच्या वेळी मोटारसायकलींच्या शर्यती लावणं, सायलेन्सर लावून मोठ्या आवाजात मोटारसायकल चालविणं आदी प्रकारही वाढले आहेत. अशा प्रकारांवर कडक कारवाई करण्यात यावी. दंड वाढीसह मोटारसायकल जप्तीची कारवाई करता येईल का? याबाबत विचार करावा, असे निर्देश रावते यांनी दिले आहेत.
वर्ष | अपघात | मृत्यू |
२०१३ | ६१,८०९ | १२,१९४ |
२०१४ | ६१,६२७ | १२,८०३ |
२०१५ | ६३,८०५ | १३,२१२ |
२०१६ | ३९,८४८ | १२,८३३ |
२०१७ | ३५,८५३ | १२,२६४ |
२०१८ | ३५,९२६ | १३,०५९ |
हेही वाचा -
'परे'वरून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून १३.९७ लाखांचा दंड वसूल
मुंबईतील सहा मेट्रो मार्गिकांचं काम २०२२ पर्यंत पुर्ण होणार