Advertisement

यंदा भाडेवाढ न करण्याचा बेस्टचा निर्णय


यंदा भाडेवाढ न करण्याचा बेस्टचा निर्णय
SHARES

कोरोनामुळं मुंबईसह राज्यात लॉकडाऊन करण्यात आलं होतं. या लॉकडाऊनमुळं वाहतूक सेवा बंद ठेवण्यात आली होती. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी बेस्टनं आपली वाहतूक सेवा सुरू ठेवली होती. दरम्यान, प्रवाशांनी बेस्टला प्राधान्य दिल्यानं बेस्टची प्रवासी संख्या २३ लाखांवर पोहोचली आहे. लॉकडाऊपूर्वी बेस्टची प्रवासी संख्या ३० लाखांच्या आसपास होती. त्यामुळं प्रवासीसंख्या आणखी वाढवण्यासाठी बेस्ट उपक्रमानं यंदा कोणतीही भाडेवाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे.

लॉकडाऊनपूर्वी म्हणजे ९ मार्च २०२० ला बेस्टची प्रवासी संख्या ३० लाख ८८ हजार ८३४ होती. १६ मार्चला ती २८ लाखांवर आली. लॉकडाऊनमुळं सुरवातीला प्रवासी संख्या पुन्हा घटली. परंतु २० नोव्हेंबरला तब्बल २२ लाख ४७ हजार ५४२ प्रवाशांनी बेस्टनं प्रवास केल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्याकडून बेस्टला २ कोटी ३ लाख ३९ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. भाडेवाढ केल्यास प्रवासी पुन्हा बेस्टकडे पाठ फिरवतील अशी भीती असल्याने भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन नसल्याचे बेस्ट समितीच्या बैठकीत महाव्यवस्थापकांकडून स्पष्ट करण्यात आले.

बेस्ट उपक्रमाच्या २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात परिवहनला १,४०७ कोटी रुपयांचे उत्पन्न आणि ३,०३१.२४ कोटी रुपये खर्च अंदाजित केला आहे. यामुळे परिवहन विभागाला १,६२४.२४ कोटी रुपयांची तूट आली आहे. गेली अनेक वर्षे बेस्टचा परिवहन विभाग तोट्यातच आहे. त्यामुळे बेस्टला फायद्यात आणण्यासाठी अनेक सूचना शिवसेना, काँग्रेस, भाजप सदस्यांनी केल्या. यावेळी काही सदस्यांनी बेस्टचे भाडे कमी केल्याने उत्पन्न कमी झाल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यामुळे बेस्ट भाडेदराचा पुनर्विचार विचार करण्याची मागणी केली. 

मेट्रो-४ सारखी सेवाही येणार असून बेस्ट उपक्रमाने आपल्या ताफ्यात अधिकाधिक वातानुकूलित बस आणण्यावर भर द्यावा आणि त्यांचे भाडेदर वाढवण्याची मागणी केली. परंतु मुंबई पालिकेकडून बेस्ट उपक्रमाला दरवर्षी मिळणारे अनुदान हे भाडेदर कमी करण्याच्या अटीवरच मिळाले आहे आणि त्यानुसार ५ रुपये तिकीट दर करण्यात आल्याचे बेस्ट महाव्यवस्थापक सुरेंद्र कुमार बागडे यांनी स्पष्ट केले.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा