'जाना था जापान, पहुच गये चीन' ही हिंदीतली म्हण तुम्ही अनेकदा ऐकली असेल, या म्हणीचा प्रत्यय मंगळवारी सकाळी १०.३० च्या सुमारास वडाळा आणि जीटीबी स्थानकावरील शेकडो प्रवाशांना आला. निमित्त होतं मध्य रेल्वेची चुकीची अनाउन्समेंट. या चुकीच्या अनाउन्समेंटमुळे वांद्र्याच्या दिशेने निघालेले प्रवासी पनवेलला जाण्यापासून थोडक्यात बचावले. मग काय, ऐन गर्दीच्या वेळेस उगीच मनस्ताप सहन करणाऱ्या प्रवाशांनी या दोन स्थानकांदरम्यान रेलरोको केला. परिणामी हार्बर लोकल काहीकाळ खोळंबली.
वडाळा स्थानकात अनाउन्समेंट झाली की ही लोकल ट्रेन वांद्र्याला जाणार आहे. त्यामुळे पनवेलच्या दिशेने जाणारे प्रवासी ट्रेनमधून खाली उतरले आणि त्याच ट्रेनमध्ये वांद्रयाला जाणारे प्रवासी चढले. जेव्हा ट्रेन वडाळ्याहून किंग्ज सर्कलच्या दिशेने जाण्याऐवजी जीटीबीच्या दिशेने निघाली, तेव्हा प्रवाशांनी तत्काळ ट्रेनची चेन खेचली आणि ट्रेन थांबवली.
Visuals from the railway tracks between Wadala and GTB after commuters pull the chain as the announcement causes chaos on Tuesday morning #Mumbai #Railways #MumbaiLocal pic.twitter.com/JPhFEuY74q
— Mumbai Live (@MumbaiLiveNews) December 19, 2017
त्यानंतर प्रवाशांनी चुकीची अनाउन्समेंट केल्याचा आरोप करत रेलरोको केला. या सर्व प्रकारामुळे ट्रेन जवळपास ५ ते ६ मिनिटं उशिरा धावली, असं मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं.
याविषयी, मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी प्रवीण पाटील यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी या बातमीला दुजोरा दिला.
प्रवाशांचा गैरसमज झाला होता. पण, इंडिकेटरला पनवेल ट्रेन लावण्यात आली होती. जेव्हा ट्रेन पनवेलच्या निघाली तेव्हा प्रवाशांनी लोकल ट्रेनची चेन खेचली. वांद्र्याच्या दिशेने जाणारे प्रवासी उतरले आणि त्यानंतर प्रवाशांनी ट्रेन थांबवली.
- प्रवीण पाटील, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे