Advertisement

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या 'बेस्ट' कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरी


कोरोनामुळे मृत्यू झालेल्या 'बेस्ट' कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरी
SHARES

कोरोनाकाळात कर्तव्यावर असताना करोनाची लागण होऊन बेस्टमधील ७६ अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मृत्युमुखी पडलेल्यांपैकी ५५ जणांच्या वारसांना बेस्ट उपक्रमात अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्यात आली आहे. त्याचबरोबर नियमानुसार संबंधित वारसांना ५० लाख रुपयांची आर्थिक मदतही दिल्याची माहिती बेस्ट उपक्रमाने दिली.

कोरोनाकाळात सुरुवातीपासून बेस्टच्या परिवहन, विद्युतसह अन्य विभागांतील कर्मचारी कार्यरत होते. अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांना मुंबईबरोबरच कल्याण, डोंबिवली, बदलापूर, वसई, विरार येथूनही बससेवा दिली. त्यासाठी चालक, वाहक कार्यरत होते. तर विद्युत विभागातील कर्मचारीही २४ तास हजर होते. ही सेवा देताना अनेकांना कोरोनाची बाधा झाली.

कार्यरत असताना २ हजार ९५८ अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यापैकी २ हजार ८३४ कर्मचारी कोरोनामुक्त झाले आहेत. बेस्टमधील अधिकारी, कर्मचारी कोरोनामुक्त होण्याचं प्रमाण हे ९६ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. शिवाय २१ जणांवर उपचार सुरू असून एकाची प्रकृती गंभीर असल्याचे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले.

कोरोनाकाळात कर्तव्यावर असताना मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपये आर्थिक मदत आणि कुटुंबातील एका सदस्याला अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार ५५ जणांना अनुकंपा तत्त्वावर बेस्टमधील विविध विभागांत नोकरी देण्यात आली आहे.

नोकरीसाठी सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्याने अन्य काही जणांना नोकरीत सामावून घेण्याची प्रक्रिया धिम्या गतीने सुरू असल्याचे सांगण्यात आले.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा