मुंबईहून पुणे आणि नाशिक लोकलनं प्रवास करणं आता लवकरचं शक्य होणार आहे. मुंबई-पुणे आणि मुंबई-नाशिक जोडण्यासाठी लोकलच्या पर्यायाचा आता गंभीरपणे विचार सुरू आहे. त्यानुसार येत्या १० जानेवारीला विशेष १२ डब्यांची लोकल चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीतून मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल होणार आहे. त्यानंतर या विशेष लोकलची चाचणी होणार आहे. ही चाचणी यशस्वी ठरल्यास लवकरचं प्रवाशांना या लोकलमधून थेट नाशिक, पुणे गाठता येणार आहे.
मुंबईहून पुणे आणि नाशिकच्या दिशेनं जाताना खंडाळा आणि कसारा घाटावरून लोकलनं जाणं अवघडं आहे. त्यामुळं या घाटातून जाण्यासाठी प्रवाशांना एक्स्प्रेसनं प्रवास करावा लागतो. दरम्यान, एक्स्प्रेसनं घाट चढण्यासाठी देखील बँकर इंजिनाची मदत घ्यावी लागते. त्यानुसार या लोकलच्या इंजिनमध्ये विशेष बदल करून या मार्गावर चालवणं सहज शक्य होईल, अशा सूचना रिसर्च डिझाईन अॅन्ड स्टॅन्डर्स आॅरगनाझेशन (आरडीएसओ) यांनी केल्या होत्या. रिसर्च डिझाईन अॅन्ड स्टॅन्डर्स आॅरगनाझेशनच्या सुचनेनुसार ही नवी लोकल बनवण्यात आली आहे.
मुंबईहून नाशिक आणि पुण्याला जाण्यासाठी एक्स्प्रेसनं जावं लागतं. परंतु, मुंबई-पुणे-नाशिक या तिन्ही शहरात नोकरी इतर कामांसाठी लोक मोठ्या प्रमाणाच येत असतात. त्यामुळं एक्स्प्रेस गाड्यांना गर्दी जास्त असते. त्यामुळं या मार्गावर लोकल सुरू झाली. तर एक्सप्रेसमधील गर्दी कमी होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा -