भाईंदर (bhayandar) रेल्वे स्थानकावरून सकाळी 8 वाजून 24 मिनिटांनी सुटणारी एसी लोकल (AC local) कायम सुरू ठेवणार असल्याचे पश्चिम रेल्वेने स्पष्ट केले आहे.
ही लोकल एसी ऐवजी सर्वसाधारण करावी यासाठी रेल्वे प्रवाशांनी आंदोलन (protest) केले होते. मात्र प्रवाशांना दिलासा देण्यासाठी भाईंदर स्थाकातून सकाळी 8 वाजता सुटणारी सर्वसाधारण लोकल ट्रेन 12 ऐवजी 15 डब्यांची केली जाणार आहे.
भाईंदर रेल्वे स्थानकातून दररोज सकाळी 8 वाजून 24 मिनिटांनी चर्चगेटला (churchgate) जाणारी लोकल ट्रेन सुटत होती. मात्र नोव्हेंबर महिन्यात ही लोकल ट्रेन एसी करण्यात आली. त्यामुळे प्रवाशांनी जोरदार विरोध केला होता.
ही लोकल पुन्हा सुरू करावी यासाठी सह्यांची मोहीम घेण्यात आली. विविध राजकीय पक्षांनी यासाठी आंदोलने देखील केली होती. आमदार नरेंद्र मेहता यांनी प्रवाशांच्या मागणी लक्षात घेऊन रेल्वेला पत्रव्यवहार करून 8.24 ची लोकल पुन्हा सर्वसाधारण करण्याची मागणी केली होती.
मात्र एसी लोकल रद्द करता येणार नसल्याचे पश्चिम रेल्वेचे (western railway) अतिरिक्त व्यवस्थापक प्रकाश बुटणी यांनी सांगितले. याबाबत रेल्वने लेखी स्पष्टीकरण दिले आहे.
दररोज सकाळी 7.59 वाजता विरार (virar) वरून चर्चगेटला जाण्यासाठी एसी लोकल सुटते. मात्र त्यात गर्दी होत असल्याने भाईंदर, मिरा रोड, दहिसर स्थानकातील प्रवाशांना त्यात चढणे अवघड होत होते. त्यामुळे भाईंदर वरून एसी लोकलची आवश्यकता होती.
भाईंदर स्थानकातून सकाळी 8 ते 8.30 दरम्यान चर्चगेटच्या दिशेने जाण्यासाठी साधारण 9 गाड्या आहेत. त्यामुळे फक्त 8.24 ची एक सर्वसाधारण लोकल एसी करण्यात आली आहे.
तरी देखील प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी 8 वाजता सुटणार्या भाईंदर- चर्चगेट लोकलमध्ये 3 डबे वाढवून 12 ऐवजी 15 डब्यांची करण्यात आली आहे, असे पश्चिम रेल्वेचे अतिरिक्त व्यवस्थापक प्रकाश बुटणी यांनी सांगितले.
हेही वाचा