मुंबई ते कोल्हापूर असा प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच छत्रपती शाहू टर्मिनस ते मुंबई या दरम्यान नवीन वंदे भारत रेल्वे धावणार आहे. क्षेत्रीय रेल्वे प्रवासी सल्लागार समितीच्या बैठकीत याबाबत मागणी करण्यात आली होती. या मागणीला रेल्वेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.
येत्या पंधरा दिवसांत ही रेल्वे टर्मिनसवरून धावण्यास सुरू होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर ते मुंबई यादरम्यान प्रवास कऱणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, पण प्रवासासाठी रेल्वेच नाहीत, त्यामुळे अनेकांना त्रास होतो. सध्या पुणे-कोल्हापूर अशी वंदे भारत ट्रेन धावतेय.
रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी यांनी बैठकीत कोल्हापूर-मुंबई वंदे भारत रेल्वेची मागणी पुन्हा लावून धरली. त्यांनी ही गाडी सकाळी मुंबईला सोडावी, असेही सुचवले. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, खासदार धनंजय महाडिक यांनीही यासाठी विशेष पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून, ही रेल्वे मंजूर झाली आहे.
नवीन वंदे भारत रेल्वेला आठ डबे असणार असून, ती 550 प्रवाशांना वाहून नेईल. बियाणी म्हणाले, “ही रेल्वे थेट मुंबईपर्यंत धावेल. लवकरच तिचे वेळापत्रक जाहीर होईल.” या रेल्वेमुळे कोल्हापूर आणि मुंबई दरम्यानचा प्रवास अधिक जलद आणि आरामदायी होणार आहे.
सध्या कोल्हापूरहून पुण्यासाठी वंदे भारत रेल्वे धावत आहे. या गाडीचे उद्घाटन 16 सप्टेंबर 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाले होते. ही मिनी वंदे भारत 2.0 प्रकारातील रेल्वे आहे.
सोमवार, गुरुवार आणि शनिवार अशी आठवड्यातून तीन दिवस धावते. यात आठ डबे असून, एसी चेअर कार आणि एसी एक्झिक्युटिव्ह चेअर कारचा समावेश आहे. मात्र, ही गाडी फक्त पुण्यापर्यंतच धावत असल्याने व्यापारी, नोकरदार आणि प्रवाशांकडून ती मुंबईपर्यंत नेण्याची मागणी सातत्याने होत होती. याला आता यश मिळाले आहे.
हेही वाचा