सकाळी कामावर निघालेल्या प्रवाशांना शुक्रवारी रेल्वेच्या रखडपट्टीला सामोरं जावं लागलं. बदलापूर-वांगणी दरम्यान इंद्रायणी एक्स्प्रेसमध्ये बिघाड झाल्याने रेल्वे सेवा विस्कळीत झाली. त्यामुळे मध्य रेल्वेची कर्जतकडे जाणारी सेवा विस्कळीत झाली. ही घटना घडताच रेल्वे प्रशासनाने दुरुस्तीचे काम सुरू केलं आहे.
सकाळी ऐन गर्दीच्या वेळी रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने नोकरदारांना फारच मनस्ताप सहन करावा लागला. तांत्रिक बिघाडामुळे इंद्रायणी एक्स्प्रेस खोळंबली असून याचा फटका कर्जतच्या दिशेने जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या आणि लोकल ट्रेनला बसला आहे.
दरम्यान, एक्स्प्रेसमध्ये नेमका काय बिघाड झाला, हे अजून समजू शकलेले नाही. मात्र, याचा फटका बदलापूर-कर्जत मार्गावरील वाहतुकीला बसण्याची शक्यता आहे.
बदलापूर-कर्जत मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने कर्जतवरून मुंबईकडे येणाऱ्या लोकल गाड्यांचं वेळापत्रकही कोलमडण्याची शक्यता आहे. पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या दिवा-पनवेल-कर्जत मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. दरम्यान, आठवडाभरातील ही तिसरी घटना आहे.