नाताळ आणि शनिवार-रविवार लागून आल्यामुळे अनेक मुंबईकरांनी सुट्टीचा प्लॅन केला असेल. अनेकजण सर्व तयारीनिशी घरातून बाहेरही पडले असतील. तुम्हीही असा प्लॅन करत असाल तर थांबा. कारण मुंबईकडे येणाऱ्या आणि मुंबईतून बाहेर जाणाऱ्या तीन महामार्गांवर तुम्हाला प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो. आणि तुमची तीन दिवसांची सुट्टी गाडीतचं थंडीच जाण्याची शक्यता आहे.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, मुंबई-गोवा आणि मुंबई-अहमदाबाद महामार्गावर सलग आलेल्या या सुट्ट्यांमुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. याशिवाय कोकणात जाणाऱ्या महामार्गावर देखील वाहतूक कोंडी पहायला मिळत आहे. त्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडालेली आहे. या महामार्गांवर गाड्यांच्या मोठ्या रांगा लागलेल्या आहे.
मुंबई- पुणे येथील वाहतुकीवर नियंत्रण आणण्यासाठी पुण्यावरुन येत असलेली वाहने ही लोण्यावळ्याजवळ थांबवली जात आहेत. तर एक-एक तासाच्या अंतराने ही वाहने खंडाळ्याकडे सोडली जाणार आहेत. तर लोणावळा येथे थांबवली जाणारी वाहने ही लोणावळा शहरातून सोडली जात आहेत. यामुळे वाहतुक कोंडी कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कोकणात जाणा-या हायवेवर देखील मुंबई-गोवा मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे. वाहन चालकांच्या निष्काळजी आणि बेशिस्तपणामुळे वाहनांच्या २ ते ३ किमीपर्यंत रांगा लागल्या आहेत. तर, मुंबईत वर्सोवा पुलाजवळ देखील वाहतूक कोंडीमुळे वाहतूक धिम्या गतीने चालत आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर लोटेजवळ टँकर उलटल्याने मुंबई-गोवा महामार्गावर आणखी कोंडी वाढली आहे. वाहनांच्या ३ ते ४ किमीच्या रांगा लागल्या आहेत. यामुळे प्रवासी तासन् तास या कोंडीत अडकले आहेत. मुंबईबाहेर जाणारे मुंबई-गोवा, मुंबई-अहमदाबाद आणि मुंबई-पुणे हे तिन्ही महामार्ग अजूनही वाहतूककोंडीत अडकले आहेत. त्यामुळे तुमचे पिकनिक प्लॅन जरा सांभाळूनच करा!