मास्क न घालताच लोकल प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढतच आहे. मागील फेब्रुवारी महिन्यापासून ते आतापर्यंत पश्चिम रेल्वेवर ५ हजारपेक्षा जास्त मास्कचा वापर न करणाऱ्या प्रवाशांना पकडण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली.
या प्रवाशांवर कारवाईचा बडगा म्हणून ८ लाख ३६ हजार ९०० रुपये दंड वसुल करण्यात आला आहे. जून २०२० पासून अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठी आणि फेब्रुवारी २०२१ पासून सामान्य प्रवाशांसाठी ठराविक वेळेत लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली.
प्रवास करताना करोना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मास्क घालणे बंधनकारक असतानाही त्याकडे अनेक जण दुर्लक्षच करतात. लोकल प्रवासादरम्यान काही प्रवाशांच्या खिशात, तर काहींच्या हनुवटीवर मास्क असतो. मास्क न घालण्याची अनेक कारणे प्रवासी देतात. अशा प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी मुंबई पालिकेकडून अनेक स्थानक व हद्दीत मार्शल नियुक्त केले आहेत.
फेब्रुवारीत ४ हजार १७ प्रवाशांवर, तर १ हजार २४३ प्रवाशांवर मार्च महिन्याच्या पाच तारखेपर्यंत कारवाई करण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली. ४ मार्चला ३०० हून अधिक मास्क न वापरणाऱ्या प्रवाशांना पकडण्यात आले आहे.