कोरोनामुळं लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मुंबईची लाईफलाइन लोकल सेवा बंद ठेवण्यात आली होती. जून महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रण आल्यावर तसंच, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेता लोकल सेवा पुन्हा सुरू करण्यात आली. सुरुवातीला केवळ अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी धावणारी लोकल सेवा आता अनेक सरकारी व खासगी कर्मचाऱ्यांसाठी धावत आहे. परंतु, अद्याप सर्वसामान्यांसाठी लोकलचे दरवाजे बंदच आहेत. त्यामुळं कामाला जाताना दररोज प्रवाशांना खिशाला कात्री लावावी लागत आहे.
मुंबई-ठाण्यातील मध्यम आणि उच्च मध्यवर्गीय, सधन कुटुंबीयांमध्ये घरकाम करणाऱ्या महिलाही कल्याणसारख्या लांबच्या भागातून लोकलने रोज ये-जा करतात. अनेकदा काही कुटुंबांकडून त्यांना महिन्याच्या पासाचे पैसे दिले जातात. लोकलमुभा नसल्याने काहींवर धुणी-भांडीची कामे सोडून घरीच बसण्याची वेळ आली आहे. मुंबईतील कपडाबाजार, भांडी बाजार, मोबाइल मार्केट ही सर्व क्षेत्रे सुरू झाली आहेत.
या बाजारपेठांमध्ये राबणारा श्रमिक ठाणे, कल्याण भागातून येतो. 'काम तर दाम' हाच नियम असल्याने लोकलअभावी त्यांची रोजीरोटीही बुडत आहे. मासेविक्रेते, दूध विक्रेते, भाजीपाला विक्रेते, उल्हासनगरमधून कच्चा माल पुरवणारे मजूर हा समाजातील मुख्य घटक आहे. आधी सुविधांपासून वंचित असलेला हा घटक प्रवास हक्कापासूनही लांब आहे.
त्यांनाही सध्या प्रवासमुभा नाही. लोकलच्या मालडब्या इतकी स्वस्त आणि वेगवान सेवा देण्यास पर्यायी व्यवस्था सक्षम नसल्यानं हा वर्ग मोठ्या प्रमाणात बेरोजगार झाला आहे.