मंगळवारी पावसानं मुंबईला चांगलंच झोडपलं. मुसळधार पावसानं अनेक ठिकाणी पाणी साचलं. त्यामुळे अनेकांची गैरसोय झाली. पावसाचा हा जोर पुढचे तीन दिवस कायम राहणार आहे. पुणे वेधशाळेनं हा इशारा दिला आहे.
येत्या ७२ तासात कोकण, गोवा, मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये अतिवृष्टीचा इशारा पुणे वेधशाळेनं दिला आहे. तसंच घाटमाथा, पुणे आणि मध्य महाराष्ट्रातही पावसाचा जोर कायम राहणार असल्याचं पुणे वेधशाळेचे प्रमुख संशोधक डॉ. अनुपम कश्यपी यांनी म्हटलं आहे.
कृष्णा आणि भीमा नदीच्या खोऱ्यातही येत्या १५ दिवसात चांगला पाऊस पडेल. त्यामुळे ऑगष्ट महिन्यात राज्यातील धरणसाठ्यातही नक्कीच समाधानकारक वाढ होईल. त्यानंतर थोडीसी उघडीप होऊन ९ ऑगष्टला राज्यात पावसाचा आणखी जोर वाढेल असंही कश्यपी यांनी सांगितलं.
हेही वाचा : दक्षिण मुंबईत पावसाचा कहर, रस्त्यावरील गाड्या पाण्याखाली
दरम्यान मुसळधार पावसामुळे मुंबईत ३ दुर्घटना घडल्या आहेत. पहिली दुर्घटना ही पहाटे वेर्स्टन एक्स्प्रेस वे वर घडली. या दुर्घटनेत कांदिवली इथं दरड कोसळली. सुदैवानं यात कुठलीही जिवीतहानी झाली नाही. मात्र काही वेळासाठी वाहतूक ठप्प झाली.
दुसरी घटना ठाण्यात घडली. विजेच्या पोलचा धक्का लागून एकाचा मृत्यू झाला. या व्यक्तीची ओळख पटू शकली नाही. तिसरी घटना सांताक्रुझ इथं घडली. नाल्यात २ घरं कोसळली. यात एका मुलीला वाचवण्यात यश आलं आहे. तर एका दीड वर्षाच्या मुलीचा मृतदेह सापडला आहे. अजून एक महिला आणि एक मुलगी बेपत्ता आहेत. त्यांच्यासाठी शोधमोहीम सुरू आहे.
हेही वाचा