तर, संभाजी भिडेंना अटक करा- रामदास आठवले

कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही. त्यामुळे भीमा-कोरेगाव प्रकरणी संभाजी भिडे जबाबदार असतील तर त्यांना मिलिंद एकबोटे यांच्याप्रमाणे अटक झाली पाहिजे. त्याआधी चौकशीसाठी संभाजी भिडेंना पोलिसांनी त्वरित ताब्यात घ्यावं, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वांद्रे येथील सभेत केली.

उपनगर मुंबई जिल्हा अधिकारी कार्यालयावर रिपाइंच्या वतीने मागासवर्गीयांच्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचं नंतर सभेत रूपांतर झालं. रामदास आठवले यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं.

'अनेकांच्या नाकाला झोबल्या मिरच्या,

कारण मी काढला आहे मोर्चा,

त्यांना काढू द्या कोणताही परचा,

मात्र मी काढणार बहुजनांच्या प्रश्नावर वेळोवेळी मोर्चा...

असं म्हणत आपण जरी केंद्र सरकारमध्ये मंत्री असलो तरी मागासवर्गीयांच्या विविध प्रश्नांवर आपण मोर्चे काढणारच, असं आठवलेंनी जाहीर केलं.

अॅक्ट्राॅसिटी अॅक्टला धक्का लावू देणार नाही

अॅक्ट्राॅसिटी अॅक्टनुसार एखाद्यावर गुन्हा नोंदविल्यानंतर पीडित दलितांवर देखील कलम ३९५ अंतर्गत खोटे गुन्हे नोंदवण्यात येतात, असं होऊ नये. सर्वोच्च न्यायालयाने अॅक्ट्राॅसिटी अॅक्टवर दिलेल्या निर्णयाशी सरकार सहमत नाही. सरकार अॅक्ट्राॅसिटी कायद्याच्या बाजूने आहे. आरपीआयनेही यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. अॅक्ट्राॅसिटी अॅक्टच्या संरक्षणासाठी आपण सरकारमध्ये राहून खंबीरपणे भूमिका मांडू. कुठल्याही स्थितीत अॅक्ट्राॅसिटी कायदा आणि आरक्षणाला आपण धक्का लागू देणार नाही, अशी भूमिका आठवलेंनी मांडली.

संविधान बदलण्याचा खोटा प्रचार

सरकार संविधान बदलण्याचा प्रयत्न करत असल्याचा खोटा प्रचार सध्या काहीजण करत आहेत. त्यावरून सरकार आणि माझीही बदनामी करत आहेत. पण देशाचं संविधान इतक्या उंचीवर आहे की त्याला कुणीही हात लावू शकत नाही. जे संविधानाच्या गाभ्याला हात घालण्याचा प्रयत्न करतील, त्यांना आम्ही घालवून देऊ, हा मोर्चा अपप्रचार करणाऱ्या विरोधकांविरूद्ध आणि सरकारला बळकटी देण्यासाठी काढण्यात आल्याचं आठवले म्हणाले.

मंत्रीपदामुळे पोटात गोळा

माझ्या मंत्रीपदामुळे काहींच्या पोटात दुखत असून त्यांचा माझ्या मंत्रीपदावर डोळा आहे. ज्या लोकांनी मला पाठिंबा देऊन माझं नेतृत्व स्वीकारलं, त्यांनी सांगितलं तर मी एका क्षणात मंत्रीपदाचा राजीनामा द्यायला तयार आहे. पण समाजात असेही काही रिकामटेकडे लोक आहेत, जे सोशल मीडियावर खोटा प्रचार करून माझा राजीनामा मागत आहेत. पण हे लक्षात ठेवा की आमच्याही लोकांना सोशल मीडिया वापरता येतो. त्यामुळेच मी राजीनाम्याची मागणी करणाऱ्यांना भीक घालणार नाही.

भीमा- कोरेगाव हल्ल्यातील साक्षीदार पूजा सकट हिची हत्या झाली असून आरोपींवर खुनाचा गुन्हा नोंदवून त्यांना कठोर शिक्षा करावी, अशी मागणीही यावेळी मोर्चेकऱ्यांनी केली.


हेही वाचा-

८ दिवसांत भिडेंना पकडा, नाहीतर..., आंबेडकरांचं सरकारला अल्टिमेटम

संभाजी भिडे मोकाट का? विरोधकांचा सवाल


पुढील बातमी
इतर बातम्या