मुलुंड - मुलुंडमधील श्री सार्वजनिक मित्र मंडळाने यंदाच्या गणेशोत्सवात गंगावतारण कथेचा देखावा उभारला आहे. मुलुंडमधील सर्वात जुने गणेशोत्सव मंडळ म्हणून ओळखले जाणाऱ्या या मंडळाची स्थापना 1952 मध्ये झाली होती. श्री सार्वजनिक मित्र मंडळ दरवर्षी धार्मिक किंवा पौराणिक कथा चलचित्रामार्फत सादर करत असते. गंगेचे पाणी अत्यंत तेजोमय असल्याने तिच्या अवतारणानंतर ती पाताळात निघून जाऊ शकते. म्हणून राजा भगीरथाने महादेवाची तपश्चर्या करून त्यांच्या जटेमधे गंगेला धारण करण्याची प्रार्थना केली होती. अशी ही गंगा अवतारणाची कथा मांडण्यात आली आहे. गणेशोत्सवात खर्चासाठी लागणारा पैसा हा मंडळातील सभासद स्वतः उभा करतात. तसेच स्थानिक रहिवाशांकडून देणगी स्वीकारली जाते, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र नायर यांनी दिली.