अभिनेत्री कंगना रणौतला मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. न्यायालयाने तिला आणि तिची बहीण रंगोली हिला अटकेपासून अंतरिम संरक्षण दिलं आहे. दोघींवर ८ जानेवारी २०२१ पर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहेत.
सोशल मीडियावर धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी वांद्रे महानगर दंडाधिकाऱ्यांनी मुंबई पोलिसांना कंगना रणौत आणि तिची बहिण रंगोली चंडेल यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले होते. याप्रकरणी दोघींवर खटला भरण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी तिला चौकशीसाठी तीन वेळा समन्स बजावले होते. या समन्सनुसार तिने सोमवारी वांद्रे पोलीस ठाण्यात हजर राहणं गरजेचं होतं. मात्र, ती हजर राहिली नाही.
या प्रकरणी कंगना आणि रंगोलीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मुंबई पोलिसांनी दाखल केलेले एफआयआर रद्द करण्याची मागणी त्यांनी केली होती. या याचिकेवर मंगळवारी उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने कंगना आणि तिची बहीण रंगोलीला अटकेपासून संरक्षण देत ८ जानेवारीपूर्वी चौकशीसाठी पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश दिले.
शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीचे छापे
महाराष्ट्र : २०२० मध्ये बिबट्यांच्या मृत्यूच्या प्रमाणात वाढ, ५ वर्षांतील सर्वाधिक मृत्यूची नोंद
यंदा भाडेवाढ न करण्याचा बेस्टचा निर्णय