मागील अनेक वर्षांपासून रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवासी संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. रेल्वे प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळे भारतीय रेल्वेला कोट्यावधी रुपयांच्या महसूल प्राप्त होतो. मात्र, तरीही रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कोणतीही ठोस पाऊल उचलली जात नसल्याचे चित्र आहे. मागील पाच वर्षांत म्हणजे २०१३ ते २०१८ पर्यंत एकूण ३५० रेल्वे अपघातात ४१९ प्रवाशांच्या मृत्यू झाला असून १०२४ प्रवाशी जखमी झाल्याची माहिती, माहिती अधिकार अधिनियम-२००५ अन्वये आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांना रेल्वे बोर्डाचे जनमाहिती अधिकारी संजोय अब्राहम यांनी दिली.
शेख यांनी रेल्वे बोर्डाकडे २०१३ पासून २०१८ पर्यंत एकूण किती रेल्वे अपघात झाले आहेत. या अपघातात किती लोकांच्या मृत्यू आणि किती जण जखमी झाले आहेत. तसंच या अपघातातून रेल्वेला किती रूपयांचे नुकसान झाले, याबाबत माहिती विचारली होती. मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिल २०१३ पासून मार्च २०१८ पर्यंत एकूण ३५० रेल्वे अपघात झाले आहेत. यात एकूण ४१९ प्रवाशांच्या बळी गेली आहे तसेच १०२४ प्रवाशी जखमी झाले आहे. या अपघातात रेल्वेला तब्बल २८२ कोटी ७८ लाखाचे नुकसान झाले आहे.
वर्ष | अपघात | मृत्यू | जखमी | नुकसान |
२०१३-१४ | ६४ | ४१ | ७९ | ३८ कोटी २ लाख |
२०१४-१५ | ७४ | ११९ | ३२२ | ७२ कोटी ८ लाख |
२०१५-१६ | ६८ | ३६ | १०१ | ५९ कोटी २४ लाख |
२०१६-१७ | ८४ | १९५ | ३४६ | ६२ कोटी २९ लाख |
२०१७-१८ | ६० | २८ | १७६ | ५१ कोटी १५ लाख |