Advertisement

धोकादायक घरांतील रहिवाशांचं तातडीने स्थलांतर करा- आदित्य ठाकरे

दुर्घटना टाळण्यासाठी धोकादायक घरांतील रहिवाशांचं तातडीने स्थलांतर करण्याचे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी स्थानिक प्रशासनाला दिले.

धोकादायक घरांतील रहिवाशांचं तातडीने स्थलांतर करा- आदित्य ठाकरे
SHARES

मुंबईत झालेल्या अतिवृष्टीमुळे (mumbai rains) चेंबूर, विक्रोळी, भांडुप आदी ठिकाणी काही घरांवर दरड कोसळल्याची घटना घडली. या घटनेत दुर्दैवी मृत्यू झालेल्यांच्या वारसांना राज्य शासनाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. अशा दुर्घटना टाळण्यासाठी धोकादायक घरांतील रहिवाशांचं तातडीने स्थलांतर करण्याचे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी स्थानिक प्रशासनाला दिले.

आदित्य ठाकरे यांनी चेंबूरमधील भारतनगर, विक्रोळी येथील सूर्यानगर, भांडुपमधील (bhandup) मुन्शी महल परिसर येथील घटनास्थळी भेट देऊन मदत कार्याचा आढावा घेतला. त्याचप्रमाणे जखमींवर तातडीने उपचार करण्याच्या सूचना दिल्या. या दुर्घटनेत मुत्यू पावलेल्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केलं. तसंच परिसरातील रहिवाशांची भेट घेऊन त्यांनी शासनामार्फत सर्व त्या उपाययोजना करण्यात येत असल्याचं सांगितलं.

यावेळी खासदार राहुल शेवाळे, आमदार रमेश कोरगावकर, सुनील राऊत, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर, स्थानिक नगरसेवक उमेश माने, निधी शिंदे, राजेश्वरी रेडकर, दीपमाला बडे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

हेही वाचा- पुढील ३ ते ४ तास ठाणे आणि रायगडसाठी महत्वाचे; पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

प्रसार माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे (aaditya thackeray) म्हणाले, रात्रीतून २०० मिमी पेक्षा जास्त पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी नैसर्गिक आपत्ती उद्भवली. दुर्घटनास्थळी पोहोचणे कठीण असतानाही बचाव पथकांनी अनेक अडचणींचा सामना करीत मदतकार्य सुरू केलं आहे. दुर्घटनास्थळी धोकादायक अवस्थेत असलेल्या घरांचे इतरत्र स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मिठी नदीची पातळी वाढल्याने तिथंही किनाऱ्यावरील लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत असल्याचं ते म्हणाले. कमी वेळेत अधिक पाऊस पडत असल्याने मुंबईत ज्या ठिकाणी पाणी साचून समस्या निर्माण होतात तेथे पाणी वाहून नेण्याची क्षमता वाढविण्यावर भर दिला जात आहे. यासाठी पाणी साठवणाऱ्या मोठ्या भूमिगत टाक्या बांधल्या जात असल्याचं त्यांनी सांगितलं.

हवामान विभागाने मुंबई आणि किनारपट्टीच्या भागात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. हे लक्षात घेता रहिवाशांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावं, असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा