मुंबईत दरवर्षी जास्तीचा पाऊस झाल्यास मुंबईची तुंबई होते. पावसाचे पाणी साचल्यानं रस्त्यांवर खड्ड्यांचं सम्राज्य निर्माण होतं. हे खड्डे इतके मोठे असतात की, चाकरमान्यांना आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. त्यामुळं मुंबईकरांचा हा त्रास वाचविण्यासाठी व मुंबईकरांना दर्जेदार रस्ते देण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रस्ते दुरुस्तीचे काम सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिलपासून तब्बल ५१ हजार ६९१ खड्डे बुजवण्यात आले आहेत. तसंच, काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे वाढलेले खड्डे कमी करण्यासाठी राबवलेल्या विशेष मोहिमेत केवळ १५ दिवसांत तब्बल ७५९४ खड्डे बुजवल्याची माहिती समोर येत आहे.
मुंबईत पालिकेचे सुमारे २ हजार किमीचे ५३४८ रस्ते आहेत. यामध्ये सुमारे ७०० किमीचे १८०९ रोड दोष दायित्व कालावधीत आहेत. तर १४७ किमीचे ४२६ प्रकल्प रस्ते आणि ११८७ किमीचे ३११३ नॉन डीएलपी रोड आहेत. या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचं काम महापालिकेची मध्यवर्ती रस्ते यंत्रणा आणि वॉर्ड ऑफिसच्या स्तरावर केले जाते. यावर्षी रस्त्यावर मोठया प्रमाणावर पडलेल्या खड्ड्यांमुळं महापालिकेवर चहुबाजूंनी टीका होऊ लागली होती.
या पार्श्वभूमीवर २८ सप्टेंबर रोजी आयुक्तांनी निर्णायक बैठक घेऊन १५ दिवसांत खड्डे बुजवण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार केलेल्या कार्यवाहीत मोठ्या संख्येनं खड्डे बुजवण्यात आले आहेत.
कोल्डमिक्सच्या माध्यमातून भरपावसातही खड्डे बुजवता येत आहेत. पालिकेच्या वरळी येथील प्लांटमध्ये हे कोल्डमिक्स तयार केले जाते. पालिकेच्या सर्व २४ वॉर्डमध्ये मागणीनुसार ३२१८ मेट्रिक टन कोल्डमिक्स वितरित करण्यात आले आहे. यामध्ये १२९७४ बॅग्स वितरित करण्यात आल्या. दरम्यान, सद्यस्थितीत पाऊसही नसल्याने रस्त्यांवरील खड्डयांचे प्रमाणही कमी झाले आहे.