कोळशावर चालणाऱ्या तंदूर भट्ट्या बंद करणाऱ्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत. 8 जुलैपर्यंत कोळशावरील तंदूर भट्टी बंद करुन इलेक्ट्रिक भट्टीचा वापर करावा, अन्यथा कठोर कारवाईचा इशारा मुंबई महापालिकेने दिला आहे.
तंदूर रोटी, चिकन हे खवय्यांचे आवडीचे पदार्थ आहेत. कोळशाच्या भट्टीत तंदूर भाजली जाते. मात्र आता मुंबईकरांना तंदूर रोटी खाता येणार नाही. कोळशाऐवजी इलेक्ट्रिक उपकरण किंवा सीएनजी, पीएनजी, एलपीजीचा वापर करण्याच्या सूचना पालिकेने दिल्या आहेत.
तसंच, तंदूर भट्टी वापरणाऱ्या रेस्टॉरंट आणि ढाब्यांना महापालिकेने नोटीस बजावली आहे. आतापर्यंत 84 ढाबे, रेस्टॉरंट हॉटेलला पालिकेकडून नोटीस देण्यात आली आहे.
सर्व बेकरी चालक, रेस्टॉरंट आणि धाबा चालकांना 8 जुलैपर्यंत कोळसा तंदूरभट्टीऐवजी इलेक्ट्रिक उपकरणांचा वापर न केल्यास कठोर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळं या पुढे खवय्यांना तंदूर रोटी, नान आणि चिकन खाता येणार नाहीत.
पालिकेने बेकरी चालकांनादेखील नोटीस बजावली आहे. बेकरीत प्रामुख्याने पाव भट्टीत भाजले जातात. त्यामुळं बटाटावड्यासोबत दिला जाणाऱ्या पावाची ओळख हरवणार का? अशी भिती खवय्यांकडून व्यक्त केली जात आहे.
मुंबईत गेल्या काही वर्षांत प्रदूषणात वाढ झाली आहे. विशेषतः बांधकामांची धुळ आणि बेकऱ्यांसह ढाबे, हॉटेलमध्ये जळणासाठी वापरले जाणारे लाकूड आणि प्लायवूडमधून मानवी शरीरासाठी घातक असलेला विषारी वायू बाहेर पडत आहे. त्यामुळं या भट्ट्यांवर बंदी घालण्यात येणार आहे.
पालिकेने केलेल्या झाडाझडतीत मुंबईत सुमारे 300 बेकऱ्यांमध्ये जळणासाठी लाकूड, प्लायवूडसारखे पदार्थ वापरले जात असल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा