Advertisement

जलवाहिनीच्या गळती दुरुस्तीचे काम १० तास आधीच पूर्ण

जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम ठरलेल्या वेळेच्या आधीच पुर्ण झाल्यानं धारावी, दादर, माहीम, प्रभादेवी, वरळी, लोअर परळ भागात मंगळवारी सकाळपासून पाणीपुरवठा पूर्ववत झाला.

जलवाहिनीच्या गळती दुरुस्तीचे काम १० तास आधीच पूर्ण
SHARES

दक्षिण मुंबईतील लोअर परळ येथील सेनापती बापट मार्गावरील गावडे चौकातील फुटलेली जलवाहीनी महापालिकेकडून दुरूस्त करण्यात आली. या १ हजार ४५० मिमी व्यासाच्या तानसा पूर्व व पश्चिम मुख्य जलवाहिनीच्या गळतीदुरुस्तीचं काम निश्चित वेळेच्या आधीच पुर्ण करण्यात आले. या जलवाहिनीचे १० तास आधीच मंगळवारी पहाटे ४.३० वाजता पूर्ण करण्यात पालिकेला यश आले.

जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम ठरलेल्या वेळेच्या आधीच पुर्ण झाल्यानं धारावी, दादर, माहीम, प्रभादेवी, वरळी, लोअर परळ भागात मंगळवारी सकाळपासून पाणीपुरवठा पूर्ववत झाला. तसंच, दुपारी २पर्यंत होणारी पाणीकपात टळली आहे.

जलवाहिनीच्या गळतीमुळे सोमवार १४ मार्चला सकाळी ८ वाजल्यापासून जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले होते. त्यामुळं लोअर परळ येथील डिलाइल रोड, बीडीडी, प्रभादेवी परिसर, जनता वसाहत, लोअर परळ विभाग, पांडुरंग बुधकर मार्ग, सेनापती बापट मार्ग, गणपतराव कदम मार्ग, ना. म. जोशी मार्ग, वीर सावरकर मार्ग, एस. एस. अमृतवार मार्ग, गोखले मार्ग, एल. जे. मार्ग, सयानी मार्ग, भवानी शंकर मार्ग, सेनाभवन परिसर, मोरी मार्ग, टी. एच. कटारिया मार्ग, कापड बाजार, माहीम पश्चिम, माटुंगा पश्चिम, दादर पश्चिम, ना. म. जोशी मार्ग, सखाराम बाळा पवार मार्ग, महादेव पालव मार्ग आदी भागांत सोमवारी पाणीपुरवठा बंद ठेवावा लागला होता.

दुरुस्तीचे काम मंगळवार १५ मार्चला दुपारी २ वाजेपर्यंत पूर्ण होण्याचा अंदाज पालिकेने व्यक्त केला होता. मात्र पालिकेच्या जल विभागातील कर्मचाऱ्यांनी क्षणाचाही अवधी न दवडता दिवसरात्र दुरुस्तीचे काम केले. सोमवारी सकाळी ८ वाजता सुरू झालेले काम मंगळवारी पहाटे पूर्ण करण्यात आले. त्यानंतर तातडीने सकाळपासूनचा पाणीपुरवठा सुरू करण्यात आला, अशी माहिती पालिकेच्या जल विभागातील अधिकारी संजय आर्ते यांनी दिली.

लोअर परळ परिसरातील काही भागांतून नागरिकांच्या अपुऱ्या पाणीपुरवठ्याच्या तक्रारी कायम आहेत. सेनापती बापट मार्गावरील इंडिया बूल येथे जलवाहिनीला गळती लागल्याने मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून येथील 'तुळशी' या चाळीत पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. आधी भातसा वीजनिर्मिती केंद्रातील बिघाड आणि सोमवारी गावडे चौकातील दुरुस्ती कामामुळे झालेल्या पाणीकपातीचा या चाळीला आणखी फटका बसला आहे.

चाळीच्या पहिल्या मजल्यांच्या वर पाणी चढत नसल्याने तळ मजल्यावरून हंडे, कळशा, बादल्या भरून पाणी वर न्यावे लागते आहे. तसेच पाण्याला पुरेसा दाब नसल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले. याबाबत पालिकेकडे तक्रार केली असता अधिकारी पाहणी करून गेले मात्र कार्यवाही काहीच झालेली नाही, असे रहिवाशांचे म्हणणे आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा