मुंबईच्या रस्त्यांवर आणि पथपथांवर वितरीत करण्यात आलेल्या अंध आणि अपगांच्या अर्थात दिव्यांगांचे स्टॉल्स आता महापालिका हटवणार आहे. हटवण्यात येणाऱ्या यासर्व स्टॉल्सधारकांचं पुनवर्सन महापालिकेच्या मंडईंमध्ये करण्यात येणार आहे. यासर्व स्टॉल्सधारक दिव्यांगांना महापालिकेच्या मंडईंमध्ये गाळे उपलब्ध करून दिले जाणार आहे.
मुंबईतील अनेक अंध आणि अपंग असलेल्या दिव्यांगांना दूरध्वनी स्टॉल्स वितरीत करण्यात आलं आहे. त्यामुळे मुंबईतील अनेक रस्ते आणि पदपथांवर दिव्यांगांचे स्टॉल्स असून आजच्या मोबाईल फोनच्या क्रांतीमुळे आता सार्वजनिक दूरध्वनी केंद्रावर कुणीही फिरकत नसल्यामुळे दिव्यांगांच्या रोजगारावर परिणाम झाला आहे. त्यामुळे टेलिफोन बुथवर अन्य वस्तू विक्रीस ठेवून रोजगार मिळवण्याचा प्रयत्न दिव्यांगांकडून केला जात आहे.
मात्र, मंडईंमधील गाळ्यांमध्ये दिव्यांगांसाठी २ टक्क्यांचं आरक्षण असल्यामुळे या गाळ्यांमध्ये टेलिफोन बुथच्या दिव्यागांचं पुनर्वसन करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाकडे विचाराधीन आहे. हे सर्व स्टॉल्स हटवून पदपथ हे नागरिकांना चालण्यास मोकळे करून दिलं जाणार आहे. आणि बुथधारक दिव्यांगांना मंडईंमध्ये २ टक्के राखीव कोट्यातून गाळयांचं वाटप केलं जाणार आहे. या गाळ्यांसाठी रितसर भाडेशुल्क आकारुन हे गाळे दिव्यांगांना दिले जाणार आहे.
यासंदर्भात उपायुक्त (विशेष) निधी चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी ही बाब विचाराधीन असून जे स्टॉल्स पदपथ आणि रस्त्यांवर आहेत, ते सर्व हटवून त्या स्टॉलधारकांना मंडईत गाळे उपलब्ध करून दिलं जाणार असल्याचं स्पष्ट केलं.