मुंबईतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आणि वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पालिकेनं नो पार्किंगचा निर्णय घेतला. अशातच आता महापालिकेनं मुंबईतील ५ मुख्य रस्ते पार्किंगमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये महर्षी कर्वे मार्ग, एस. व्ही. रोड, गोखले रोड, न्यू लिंक रोड, एल.बी.एस. मार्ग या शहरातील महत्त्वाच्या मार्गावर वाहनं उभी करण्यास मज्जाव करण्याचा निर्णय पालिकेनं घेतला आहे. तसंच, या मार्गावरील बेस्ट थांब्यांच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी ५० मीटर म्हणजे १०० मीटर परिसरात वाहनं उभी करण्यास मनाई असणार आहे. येत्या ३० ऑगस्टपासून या ५ रस्त्यांवर 'पार्किंगमुक्ती'ची प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी सुरू करण्यात येणार आहे.
महापालिकेनं या सर्व रस्त्यांचा मिळून सुमारे १४ किमीचा भाग रस्त्याच्या दोन्ही बाजूनं पार्किंगमुक्त करण्याचं ठरवलं आहे. या मार्गावरील बेस्ट बस थांब्यांच्या दोन्ही बाजूला ५० मीटर यानुसार एकूण १०० मीटरच्या परिसरात ‘नो पार्किंग’ अधिक प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी संबंधित परिमंडळीय सहआयुक्त, उपायुक्त, विभागस्तरीय साहाय्यक आयुक्त यांना दिलं आहेत.
महापालिकेच्या २६ सार्वजनिक वाहनतळांलगतच्या ५०० मीटर अंतराच्या परिसरात ‘नो पार्किंग’ राबविण्याचा निर्णय घेत रस्त्यावर बेकायदेशीर वाहनं उभे करणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांच्या सहकार्यानं दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली.
याचा पुढचा टप्पा म्हणून मुंबईतील महत्त्वाच्या रस्त्यांवरील वाहतुकीला गती मिळावी यासाठी या रस्त्यांचे काही भाग वाहनतळमुक्त करण्याचं पालिकेनं ठरवलं आहे.
हेही वाचा -
मागण्यांबाबत चर्चा फिस्कटली, उपोषण कायम- शशांक राव
शाळा, शिक्षकांना अनुदान, ३०४ कोटी रुपयांचा खर्च