Advertisement

मुंबईकरांना दिलासा! पालिकेने १० टक्के पाणीकपातीचा निर्णय मागे घेतला

आता मुंबईत पाणीकपात होणार नाही

मुंबईकरांना दिलासा! पालिकेने १० टक्के पाणीकपातीचा निर्णय मागे घेतला
SHARES

पाणलोट क्षेत्रातील तलावांमध्ये चांगला पाऊस झाल्याने बीएमसीने मुंबईतील १० टक्के पाणीकपात रद्द केली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाणीसाठ्यात एकाच दिवसात सात टक्क्यांनी वाढ झाली आहे. शुक्रवार सकाळपर्यंत एकूण साठा 25.94% वर आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात अपूर्ण पर्जन्यवृष्टीमुळे उपलब्ध जलसाठा होता. हे लक्षात घेऊन चांगला पाऊस होईपर्यंत मुंबई महानगरपालिका प्रशासनातर्फे मुंबईच्या पाणीपुरवठ्यात दिनांक २७ जून २०२२ पासून १० टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र हा निर्णय आता रद्द (cancel)करण्यात आला आहे.

जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून मुंबई, तसेच मुंबईला पाणी पुरवठा होणाऱ्या धरण क्षेत्रात पावसाने जोर धरला. पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे आणि पुरेशा प्रमाणात जलसाठा उपलब्ध झाल्याने आजपासून (दिनांक ८ जुलै २०२२)पाणी पुरवठ्यातील १० टक्के पाणी कपातीचा निर्णय रद्द करण्यात आला आहे.

मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा जलाशय, भातसा, विहार आणि तुळशी या सात जलाशयांमध्ये मिळून संपूर्ण मुंबई महानगराला पाणीपुरवठा करण्यासाठी एकूण उपयुक्त जलसाठा १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतका असावा लागतो.

त्या तुलनेत दिनांक २७ जून २०२२ रोजी १ लाख ३१ हजार ७७० दशलक्ष लिटर म्हणजे ९.१० टक्के एवढाच उपयुक्त जलसाठा उपलब्ध होता. आज ३ लाख ७५ हजार ५१४ दशलक्ष लिटर म्हणजे २५.९४ टक्के एवढा उपयुक्त जलसाठा उपलब्ध आहे.

मात्र, तलाव क्षेत्रात समाधानकारक पर्जन्यवृष्टी झाल्याने १० टक्के पाणी कपात रद्द करण्यात आली आहे, असे प्रशासनातर्फे कळविण्यात येत आहे. तलाव क्षेत्रात पुरेशा प्रमाणात जलसाठा उपलब्ध होत असला तरी, नागरिकांनी पाण्याचा वापर काळजीपूर्वक करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.



हेही वाचा

मुंबईतील समुद्रकिनाऱ्यावर जाण्यास बंदी, महापालिकेच्या सूचना जारी

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा