समुद्रकिनारे, उद्यान आणि प्रार्थनास्थळांचा आसपासचा परिसर, फूटपाथ आदी ठिकाणी दाणे टिपणारी, मध्येच पंखांची फडफड करीत भिरभिरणारे कबुतरांचे थवे दृष्टीस पडतात. अनेक इमारतींच्या छताच्या कोपऱ्यात एक विशिष्ट आवाज करीत विसावणारी कबुतरे आता नागरिकांच्या आरोग्यास (health) धोकादायक बनू लागली आहेत.
प्राण्यांवरील भुतदयेतून कबुतरांना (pigeons) खाद्य उपलब्ध करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. परंतु याच कबुतरांमुळे आता नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या (problems) वाढू लागल्या आहेत.
ही बाब लक्षात घेऊन कबुतरांविषयी जनजागृती करण्यासाठी ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री ऑफ सोसायटी’ने (BNHS) ‘जेएसडब्ल्यू’च्या सहकार्याने कबुतरांच्या वाढत्या संख्येवर जनजागृती करण्यासाठी ‘मर्सी फीडिंग: पिजन मेनेस इन अर्बन एरियाज’ हा माहितीपट तयार केला आहे.
बीएनएचएस’चे अध्यक्ष प्रवीण परदेशी यांच्या उपस्थितीत ‘जेएसडब्ल्यू’च्या संगिता जिंदाल यांच्या हस्ते मंगळवारी माहितीपट प्रदर्शित करण्यात आला.
शहरात कबुतरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेक सार्वजनिक ठिकाणी कबुतरांचे थवे दिसत असून, मुंबईकर (mumbai) त्यांना खायला घालत आहेत. मात्र, कबुतरांमुळे आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होत आहेत.
इतर पक्ष्यांच्या तुलनेत कबुतरांची संख्या वाढण्याचा वेग अधिक आहे. कबुतरांनी मानवी वस्त्यांमधील इमारतींच्या कानाकोपऱ्यात घरटी बनवून राहणे पसंत केले आहे. याचबरोबर नागरिकांकडून पुरेसे खाद्य उपलब्ध होत असल्यानेही शहरी भागात कबुतरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
कबुतरांमुळे श्वसनविषयक आणि फुफ्फुसाचे गंभीर आजार (disease) होत असल्याची बाब वारंवार अधोरेखित केली जाते. विशेषत: कबुतरांची विष्ठा आणि त्यांच्या अंगावरील धुळ यामुळे अनेक आजार उद्भवतात. कबुतरांच्या विष्ठेतून जंतूसंसर्ग होण्याचा धोका असतो.
कबुतर हा पक्षी जीवघेणा ठरू लागल्याने त्यावर उपाययोजना करण्याची गरज आहे. त्यामुळे बीएनएचएसने या माहितीपटाची निर्मिती केली आहे. कबुतरांची संख्या कमी करावयाची तर त्यांना मारण्यास कायदेशीर बंदी आहे.
त्यामुळे कोणतीही शासकीय यंत्रणा हे काम करू शकत नाही. याउलट नागरिकांनीच कबुतरांना खाद्य देऊ नये, हे खाद्य मुबलक प्रमाणात उपलब्ध केल्यास त्यांचे मानवी आरोग्यावर काय परिणाम होतात आदी बाबी या माहितीपटात समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, प्राणी व पक्षी संरक्षणासाठी काम करणाऱ्या ‘पेटा’ संस्थेने कबुतरांची संख्या कमी करण्यासाठी प्रभावी उपाय सुचविले आहेत. कबुतरांचे खाद्य कमी करावे. खाद्य कमी झाल्यास कबुतरांची संख्या आपोआप नियंत्रणात येईल. एक कबुतर वर्षात 4 ते 6 वेळा अंडी घालते.
एका वेळेला किमान दोन पिले जन्माला येतात. खाद्याचा पुरवठा कमी झाल्यास कबुतर वर्षाला एकदा अथवा दोनदाच अंडी घालू शकतील. त्याचबरोबर खाद्याची टंचाई असेल, तर कबुतरे पिलांना जन्म देणे टाळतील. यातून त्यांची संख्या आपोआप नियंत्रणात येईल, असे ‘पेटा’ने म्हटले आहे.
कबुतरांमुळे होणाऱ्या आजारांची नागरिकांनी गंभीर दखल घ्यायला हवी. तसेच त्यांना खाद्य देणे प्रामुख्याने टाळावे जेणेकरून आजारांवर आणि कबुतरांवरही नियंत्रण मिळवता येईल. या उद्देशाने या माहितीपटाची निर्मिती करण्यात आली आहे. – प्रवीण परदेशी , अध्यक्ष, बीएनएचएस
हेही वाचा