बाटलीबंद पाणी, शीतपेये अाणि बिअर पिणाऱ्यांसाठी वाईट बातमी. अाता पाणी, शीतपेये अाणि बिअर महागण्याची शक्यता निर्माण झाली अाहे. कारण या उद्योगांसाठी देण्यात येणाऱ्या पाण्याच्या दरात तब्बल २५ टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणानं घेतला अाहे. नव्या दरांबाबतची माहिती प्राधिकरणाचे अध्यक्ष के. पी. बक्षी यांनी शुक्रवारी मुंबईत दिली.
प्राधिकरणाच्या समितीनं ठरवलेले नवे दर १ फेब्रुवारीपासून लागू करण्यात येणार असल्याची माहिती प्राधिकरणाचे अध्यक्ष के. पी. बक्षी यांनी यावेळी दिली. दर तीन वर्षांनी पाण्याचे दर ठरवले जातात. मात्र २०१० नंतर काही अपरिहार्य कारणामुळे नवे दर ठरवण्यात अाले नव्हते. अाता नवे दर पुढील महिन्यापासून लागू करण्यात येणार अाहेत.
घरघुती वापरासाठी पाणी घेणाऱ्या महापालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायतींसाठी पाणी पुरवठ्याचा मानक दर अनुक्रमे २५ पैसे, १८ पैसे आणि १५ पैसे प्रति घनमीटर इतके निश्चित करण्यात आले आहेत. वैयक्तिक शेतकऱ्यांसाठी पाण्याचा दर खरीप, रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी अनुक्रमे १ हजार लिटरला ४.५० पैसे, ९.०० पैसे आणि १३.५० पैसे असा निश्चित करण्यात आला आहे.
२०११ | २०१८ | |
ग्रामपंचायत | १३.२ पैसे | १५ पैसे |
नगरपालिका | १५.८ पैसे | १८ पैसे |
महानगरपालिका | २१ पैसे | २५ पैसे |
टाऊनशिप | २१ पैसे | १ रु. २५ पैसे |