मुंबई शहर आणि किनारपट्टीला लवकरच ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्राद्वारे संरक्षण मिळणार आहे. हे क्षेपणास्त्र मुंबई शहर आणि किनारपट्टीवरील रडारशी संलग्न असतील.
काही दिवसांपूर्वीच केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या अध्यक्षतेखाली संरक्षण खरेदी परिषदेची (DAC) बैठक झाली. या बैठकीत ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्र सर्व किनारपट्ट्यांवर बसविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 'नेक्स्ट जनरेशन मेरिटाइम मोबाइल कोस्टल बॅटरीज' नावाचा हा जवळपास १३५० कोटी रुपयांचा प्रकल्प आहे.
मुंबईवर २६/११ रोजी दहशतवादी हल्ला झाल्यानंतर मुंबई किनारपट्टीवर स्वयंचलित ओळख प्रणाली (AIS) लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार मुंबई किनारपट्टीलगत साधारणत: २० ‘एएआय’ बसविण्यात आले. या यंत्रणेच्या माध्यमातून समुद्रातून मुंबईच्या दिशेने येणारी प्रत्येक होडी ओळखता येते.
सोबतच खोल समुद्रातील संशयास्पद हालचाली टिपण्यासाठी देशभरातील किनारपट्टीवर एकूण ५७ रडार किनारपट्टीवर बसविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यापैकी ४१ रडार बसविण्यात आले असून त्यापैकी १० रडार पश्चिम किनारपट्टीवर आहेत. तर ४ रडार मुंबई किनारपट्टीवर लावण्यात आले आहेत.
रडारची क्षमता १७० किमी आहे. या रडारला हे ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्र संलग्न असतील. याद्वारे रडारने शत्रूचं जहाज टिपलं की त्यावर क्षणार्धात 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्र डागण्यात येईल. जमिनीवरून जमिनीवर, समुद्रात आणि हवेत मारा करणारे, 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राचे ३ प्रकार आहेत.
हेही वाचा-
दाऊदच्या आणखी एका हस्तकाला अटक
बेवारस वाहनांच्या कारवाईसाठी रेल्वे सुरक्षा दलाचं ‘ऑपरेशन नंबर प्लेट’ अभियान