मुंबईसह उपनगरातील अनेक प्रवासी रेल्वे स्थानकापासून (Railway Station) दूर राहत असल्यानं प्रवाशी त्यांची दुचाकी व चार चाकी वाहनं रेल्वेच्या हद्दीत पार्क करतात. वाहनं पार्क करण्यासाठी रेल्वे स्थानकातील आजूबाजूचा परिसर, रेल्वेचे पार्किंग क्षेत्र आणि नो पार्किंग क्षेत्राचाही वापर केला जातो. मात्र अनेकदा पार्क केलेल्या या गाड्या अशाच धूळ खात राहतात. त्यामुळं या वाहनांवर कारवाई करण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलानं प्रत्येक रेल्वे परिसरात ‘आॅपरेशन नंबर प्लेट’ सुरू केलं होतं. यावेळी एक किंवा त्यापेक्षा अधिक दिवसांच्या कालावधीमध्ये रेल्वे परिसरात पार्किंग केलेल्या गाड्यांवर कारवाई करण्यात आली.
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वे मार्गावर रेल्वे सुरक्षा दलाकडून ९ ते ११ आॅगस्ट या कालावधीत राज्यातील ४६६ रेल्वे स्टेशनवर राबविण्यात आलं होतं. या दरम्यान चोरी केलेली ४ वाहने जप्त करण्यात आली आहेत. तसंच, रेल्वे स्टेशन परिसराच्या हद्दीत ५ दिवसांपेक्षा जास्त दिवस उभी असलेली ३ हजार ९४३ वाहनं बेवारस असल्याचं समोर आलं. त्याशिवाय, आणखी ८९४ वाहनांची पडताळणी प्रक्रिया सुरु असून, ही झाल्यावर त्यावर योग्य ती कारवाई केली जाणार आहे. २०३४ वाहने एक दिवसापेक्षा जास्त वेळ नो पार्किंग क्षेत्रातील पार्क केलेली असल्याचं समोर आलं असून, २८ वाहनांची चौकशी सुरु आहे.
रेल्वे सुरक्षा दलानं केलेल्या या कारवाईदरम्यान जवळपास ५४९ वाहनांना टो करण्यात आलं आहे. ही टो करण्यात आलेली वाहनं पुढील कारवाईसाठी पोलिसांकडं सोपवण्यात आली आहेत. तसंच, रेल्वे स्टेशनच्या हद्दीत अनधिकृत पार्किंग करणाऱ्या वाहनांकडून तब्बल ५९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
दरम्यान, मध्य रेल्वे प्रशासनानंही हे अभियान रेल्वे स्थानकाच्या हद्दीत राबवलं आहे. यामध्ये एक दिवसांपेक्षा जास्त वेळ पार्क करणाऱ्या वाहनांमध्ये ११४ वाहनांचा समावेश आहे. तर, ४० वाहनं नो पार्किंग क्षेत्रात जवळपास ५ दिवस पार्क केली होती. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी, भायखाळा, कुर्ला टर्मिनस, कुर्ला स्टेशन, ठाणे, डोंबिवली, कल्याण, बदलापूर, अंबरनाथ या महत्त्वाच्या स्थानकावर हे अभियान सुरु करण्यात आलं. यावेळी मध्य रेल्वेनं २६ हजार १४० रुपये दंड वसूल कला आहे.
हेही वाचा -
वाहनतळासाठी महापालिका मुंबईतील या ठिकाणांचा करणार वापर
राजकीय नेत्यांसह 'क्रिकेटचा देव'ही धावला पूरग्रस्तांच्या मदतीला