मुंबई महापालिकेच्या मंडयांमध्ये दररोज निर्माण होणाऱ्या भाजीपाल्याच्या कचऱ्याची विल्हेवाट आता त्याच ठिकाणी लावली जाणार आहे. भाजीपाल्याच्या या कचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्प राबवून या कचऱ्याची विल्हेवाट लावली जाणार आहे. यासाठी महापालिकेच्या ५ ते ६ मंड्यांमध्ये 'वेस्ट कन्व्हर्टर' बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई महापालिकेच्या सुमारे ९२ मंडया असून यापैकी महात्मा ज्योतिबा फुले मंडई अर्थात क्रॉफर्ड मार्केट, दादरची वीर सावरकर मंडई, क्रांतिसिंह नाना पाटील मंडई, मालाडचे साईनाथ मार्केट, भायखळा मार्केट आदी मार्केटमध्ये दररोज मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होतो. महापालिकेच्या यासर्व मंडईंमध्ये दररोज दिवसातून ३ वेळा कचरा साफसफाई केली जात आहे.
महापालिका प्रशासनाने मुंबईतील सर्व मोठ्या गृहनिर्माण संस्थांसह सर्व संकुलांना २ ऑक्टोबरपासून कचऱ्याची विल्हेवाट स्वत:च लावण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे मंडईत निर्माण होणारा कचरा डम्पिंग ग्राऊंडवर नेऊन टाकण्याऐवजी त्या कचऱ्याची विल्हेवाट तिथेच लावण्याच्या सूचना महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिल्या आहेत. महापालिकेच्या मोठ्या भाजी मंडयांमध्ये जेथे अधिक कचरा निर्माण होत असेल अशा मंडयांबाबत देखील तिथे निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट मंडई स्तरावरच लावण्याचे आदेश अजोय मेहता यांनी बाजार विभागाचे सहायक आयुक्तांना मागील मासिक आढावा बैठकीत दिले होते.
आयुक्तांच्या सुचनेनुसार मोठ्याप्रमाणात ओला कचरा निर्माण होणाऱ्या क्रॉफर्ड मार्केटसह पाच ते सहा मंडईंमध्ये कचऱ्याची विल्हेवाट लावली जाणार आहे. सर्व मंडईंमधून दरदिवशी ४६ मेट्रीक टन कचरा निर्माण होतो. त्यामुळे मंडईतील या कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी ५ ते ६ ठिकाणी ‘वेस्ट कन्व्हर्टर’ बसवण्याची प्रक्रीया सुरु असल्याची माहिती उपायुक्त (विशेष)निधी चौधरी यांनी दिली आहे.
महापालिका मंडयांमध्ये दररोज दिवसातून ३ वेळा साफसफाई केली जाते व तेथील कचरा उचलला जातो. त्यामुळे हा कचरा ठरवून दिलेल्या ठिकाणीच टाकावा, असे आवाहन महापालिकेच्यामाध्यमातून गाळेधारकांना करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)