मुंबईत येत्या ९ ऑगस्ट रोजी मराठा समाजाच्यावतीने मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून या मोर्चातील लोकांना पाण्याची तसेच फिरत्या शौचालयांची सुविधा महापालिकेच्या वतीने पुरवण्याची मागणी काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. या सेवा सुविधांसाठी येणारा सर्व खर्च आपण महापालिकेला देऊ, असेही त्यांनी या निवेदनात म्हटले आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीकरता मराठा समाजाच्या वतीने आझाद मैदानात विरोट मोर्चा काढला जाणार आहे. भायखळा जिजामाता उद्यान अर्थात राणीची बाग पासून या मोर्चाला सुरुवात होणार आहे. आझाद मैदानावर धडकणाऱ्या या मोर्चासाठी राज्यभरातून सुमारे ७० ते ८० लाख मराठा समाज एकवटणार आहे. त्यामुळे या मोर्चात सहभागी होणाऱ्या मोर्चेकरांसाठी पिण्याची पाणी आणि फिरत्या शौचालयांची व्यवस्था महापालिकेच्या वतीने करण्यात यावी अशी आपली मागणी असल्याचे काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी म्हटले आहे.
मुंबईत अशा प्रकारे लाखोंच्या संख्येने मार्चेकरी जमणार असल्यामुळे त्यांच्यासाठी पिण्याचे पाणी व शौचालयांची व्यवस्था करण्यासाठी जो काही खर्च येईल तो आपण महापालिकेकडे भरणार आहे. त्याबाबतचे पत्र आपण महापालिका आयुक्त अजोय मेहता यांना २ ऑगस्ट रोजी दिले असल्याचे राणे यांनी सांगितले. जर आझाद मैदानात सुरु होणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धेसाठी महापालिकेच्या वतीने जर सेवा सुविधा पुरवली जात असेल तर मराठा मोर्चेकरांसाठी देण्यास हरकत काय आहे, असा सवाल करत त्यांनी आपल्या ही सेवा मोफत नको आहे. यासाठी नियमानुसार जे शुल्क भरायचे आहे, ते आम्ही भरू. एखादा खासगी कार्यक्रमांच्या आयोजकांनी शुल्क भरल्यानंतर त्यांना ज्याप्रमाणे सेवा पुरवली जाते, त्याचप्रमाणे आम्हाला ही सुविधा दिली जावी, अशी आपली मागणी असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले.