पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या #9बजे9मिनट या आवाहावरून गेले दोन दिवस चर्चा रंगल्या होत्या. बरोबर ९ वाजता ९ मिनिटं घरातील लाईट बंद करून दिवे, मेणबत्ती लावण्याचं आवाहन पंतप्रधान नेरंद्र मोदी यांनी केलं होतं. पण एकाच वेळी म्हणजे ९ वाजता सर्वांनी लाईट बंद केल्यावर पॉवर ग्रीडवर परिणाम होऊन ग्रीड निकामी होऊ शकतो, अशी भिती उर्जा विभागाला होती. पण हे संकट टळलं ते महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरणच्या अभियंते, कर्मचाऱ्यांनी केलेल्या नियोजनामुळे.
महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरणच्या अभियंते, कर्मचाऱ्यांनी केलेल्या नियोजनामुळे पॉवर ग्रीडवर कोणताच परिणाम झाला नाही. परिणामी दिवे बंद करण्याच्या आवाहनानंतर राज्यातील वीज पुरवठा सुरळीत असल्याची माहिती वीज विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
या परिस्थितीत, कोयना आणि टाटा पॉवरचे जलविद्युत प्रकल्प हे फायदेशीर ठरले. जलविद्युत प्रकल्पात मागणीनुसार वीज निर्मिती कमी जास्त करता येते. सुरुवातीला कोयना प्रकल्पातून १८३० मेगावॅट आणि टाटा पॉवरच्या खोपोली इथल्या वीज केंद्रातून ४०५ मेगावॅट वीज निर्मिती सुरू होती. विजेची मागणी जशी कमी होत गेली तशी तत्काळ कोयनेतून वीज निर्मिती ४१२ मेगावॅट, टाटाची १४ मेगावॅटपर्यंत वीज निर्मिती कमी करण्यात आली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार आज रात्री ९ वाजता वीज दिवे बंद करून दिवे लावण्यात आले. पंतप्रधानांच्या या आवाहनामुळे पॉवर ग्रीडवर परिणाम होऊन वीज पुरवठ्यावर विपरीत परिणाम होईल, अशी भीती वीज अभियंते, वीज तज्ञांनी व्यक्त केली होती.
राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनीदेखील याबाबत ऊर्जा खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. महापारेषण विभागानं आजच्या या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजना आखल्या होत्या. त्याच्या परिणामी पॉवर ग्रीडवर कोणताही परिणाम झाला नाही. देशभरातही इतर राज्यांनी अशाच प्रकारची खबरदारी घेतली होती. त्यामुळे देशात कुठेही वीज पुरवठा खंडीत झाला नसल्याचे समोर आले आहे.
१) ४०० के.व्ही. Bus (टेक्निकल कोड) आणि लाईन्सचे सर्व रिऍक्टर्स कार्यान्वित असून प्रणालीला जोडले आहेत की नाही याची अभियंत्यांनी करणं.
२) महापारेषण प्रणालीतील उपकेंद्रामध्ये कार्यान्वित असलेले सर्व Capacitors प्रणालीपासून विलग करणं.
३) उपकेंद्र प्रमुख त्यांच्या-त्यांच्या उपकेंद्रात/मुख्यालयात हजर होते. प्रणालीत काही अचानक अडचण आल्यास ती निवारण करून प्रणाली सुस्थितीत कार्यरत ठेवणं, त्यांची जबाबदारी होती.
४) सर्व अधीक्षक/मुख्य अभियंता यांनी आपआपल्या कार्यक्षेत्रात देखरेख आणि नियंत्रण ठेवलं, दक्ष राहून प्रणालीवर देखरेख केली. उपकेंद्रात/मुख्यालयात उपलब्ध नसणे ही बाब कर्तव्याची मर्यादा उल्लंघन करणारी समजली जाईल, असे आदेश त्यांना देण्यात आली होती.
५) ४०० के. व्ही. वाहिन्या आणि ICT जे सद्यस्थितीत बंद करण्यात आलेले होते. ते बंद स्थितीतच ठेवायचे होते. इतर काही वाहिन्या/ICT बंद करावयाच्या असल्यास राज्य भार प्रेषण केंद्राकडून (SLDC) तसे निर्देश देण्यात आले होते.
६) २२० के. व्ही. ICT आणि Power Transformer चे Tap वापरून विद्युत दाबाचे नियमन करण्यात आले होते.
७) ४०० के. व्ही. कोयना टप्पा-४ ते लोणीकंद आणि जेजुरी वाहिन्या सुस्थितीत चालू ठेवण्यात आल्या होत्या. या वाहिन्या कोयना जलविद्युत निर्मिती वहनासाठी प्रणालीच्या दृष्टिनं अत्यंत महत्त्वाच्या आहेत.
८) या उपाययोजना करताना अभियंतांकडून Covid-19 च्या संदर्भात जारी करण्यात आलेले मास्क वापरणे, Social Distancing आणि सॅनिटायझेशन अशा मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले होते.
हेही वाचा