पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रात्री ९ वाजता घरातील लाईट बंद करून मेणबत्ती, दिवा, टॉर्च पेटवण्याचं आवाहन केलं आहे. यामागे जरी त्यांचा हेतू असला तरी हा निर्णय करोडो देशवासियांवर भारी पडू शकतो. आता पंतप्रधानांच्या या घोषणेमुळे सध्या उर्जा विभागाची झोप उडाली आहे.
कोरोनामुळे सगळ्यांच्या मनात जो अंधार निर्माण झालाय तो दूर करण्यासाठी दिव्यांचा प्रकाश प्रेरणा देईल. म्हणून लोकांनी घरातल्या लाईट बंद करून दिवा, मेणबत्ती पेटवावी, असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा या मागचा हेतू आहे. परंतु, एकाच वेळी सगळ्यांनी लाईट बंद केली तर देशाचा वीज पुरवठा ठप्प होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
वीज ही साठवून ठेवता येत नाही. मागणी आणि पुरवठ्याप्रमाणे त्याचं काम सतत सुरू असतं. पण अचानक वीजेची मागणी एकदम कमी झाली तर विद्युत ग्रिडवर याचा परिणाम होऊ शकतो. विद्युत ग्रिडवर याचा परिणाम झाला तर देशभरातल्या वीज पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. यामुळे वीज पुरवठा देखील ठप्प होऊ शकतो, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे.
१) जर सर्व देशात एकाच वेळी लाईट बंद केली तर विजेची मागणी कमी होईल. लॉकडाऊनमुळे आधीच विजेची मागणी कमी झाल्यामुळे विद्युत निर्मिती आणि पुरवठा यांचं गणित बिघडलं आहे.
२) जर सर्वांनी एकाच वेळी लाईट बंद केली तर सेंट्रल ग्रिड हाय फ्रिक्वेन्सीवर निकामी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
३) सध्या महाराष्ट्राची विजेची मागणी 23000MW (मेगावॅट) वरून 13000MW झाली आहे. Lockdown मुळे औद्योगिक वीज भार कमी झाला आहे.
४) सध्या मागणी असलेली 13000MW वीज ही फक्त अत्यावश्यक सेवा आणि घरगुती वापरासाठी वापरली जातेय.
५) जर सर्वांनी अचानक दिवे बंद केले तर ग्रिड फेल होऊन सर्व पॉवर स्टेशन हाय फ्रिक्वेन्सीवर ट्रिप होतील आणि संपूर्ण राज्य अंधारात जाईल.
महाराष्ट्रसारख्या मोठी विजेची मागणी असलेल्या राज्यांत जर ग्रिड निकामी होऊन पॉवर स्टेशन बंद पडेल. तर मल्टि स्टेट ग्रिड निकामी होईल आणि पूर्ण देश अंधारात जाईल. हॉस्पिटल सेवा विस्कळीत होतील. एक पॉवर स्टेशन पुन्हा सुरू होण्यास साधारण १६ तास लागतात. याप्रमाणे सर्व परिस्तिथी पुर्वपदावर येण्यास १ आठवडा जाऊ शकतो, अशी माहिती एक वीज अभियंत्यानं नाव न छापण्याच्या अटीवर सांगितली आहे.
दरम्यान महाराष्ट्रात विजे संदर्भात काही समस्या उद्भवू नये यासाठी भारनियमन होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारनियमनामुळे पॉवर ग्रिडवर येणारा ताण काही अंशी कमी करण्याचा प्रयत्न होणार आहे. याबाबतच्या सुचना येत्या दोन दिवसात देण्यात येण्याची शक्यता आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली.
हेही वाचा