कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं उपाययोजना सुरू केल्या आहेत. राज्यातील शाळा महाविद्यालये बंद करण्यात आली आहे. सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आली आहेत. एवढेच नाही तर राज्यातील लहान-मोठी मंदिरे भाविकांसाठी बंद करण्यात आली आहे.
असं असताना मुंबईतील प्रसिद्ध हाजी अली दर्गा ट्रस्टनं दर्गा बंद न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, दर्ग्यावर येणाऱ्या भाविकांसाठी काही बंधनं घालण्यात आल्याची माहिती हाजी अली दर्गा ट्रस्टचे प्रशासकीय अधिकारी मोहम्मद अहमद ताहेर यांनी दिली आहे.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक एक तासानंतर दर्गा सेनिटाईज करण्यात येणार आहे. दर्गा आधी भाविकांसाठी दिवसभरात १० ते ११ तास खुला ठेवण्यात येत होता. आता मात्र, केवळ ४ ते ५ तास खुला ठेवण्यात येणार आहे. नमाझ पठणासाठीही कमीत कमी भाविकांनी दर्ग्यावर यावे, असं आवाहन देखील ट्रस्टनं केलं आहे.
हाजी अली दर्ग्यावर दररोज ५० हजारांहून जास्त भाविक येतात. या पार्श्वभूमीवर दर्ग्याची स्वच्छता आणि भाविकांच्या सुरक्षिततेसाठी विशेष काळजी घेण्यात येत आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक एक तासानंतर दर्गा सेनिटाईज करण्यात येणार आहे.