मुंबईतील रस्ते घोटाळ्याचा पहिल्या टप्प्यातील ३४ रस्त्यांचा चौकशी अहवाल महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना सादर केला आहे. परंतु महापौरांना, हा अहवाल सादर केल्यानंतरही त्याची प्रत गटनेते तसेच नगरसेवकांना मिळालेली नाही. त्यामुळे या रस्ते चौकशीचा अहवाल गेला कुठे? असा सवाल सदस्यांकडून केला जात आहे. जाणीवपूर्वक विलंब करून हा चौकशी अहवाल दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा एकप्रकारे आरोप करत भाजपा आणि काँग्रेसने महापौरांवरच संशय व्यक्त केला आहे.
मुंबईतील एफ-दक्षिण, एफ-उत्तर, जी-दक्षिण व जी-उत्तर या विभागातील रस्त्यांची व चौकांची आणि रस्त्यांवरील खड्डयांची दुरुस्ती करण्याच्या प्रस्ताव मंजुरीला आला असता विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी, २३४ रस्त्यांच्या घोटाळ्याची चौकशी अहवाल बनवला जात आहे. त्यातील ३४ रस्त्यांच्या घोटाळ्याचा अहवाल बनवला असून ३१ जानेवारी २०१८ ला उर्वरीत २०० रस्त्यांचा अहवाल सादर केला जाणार होता. परंतु या मुदतीनंतर ७ दिवस उलटून गेल्यानंतरही हा अहवाल सादर केलेला नाही.
३४ रस्त्यांच्या घोटाळ्याच्या चौकशीचा अहवाल महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी महापौरांना सादर केला आहे. परंतु महापौरांना हा अहवाल सादर करूनही तो अद्यापही नगरसेवकांना मिळालेला नाही. तसेच २०० रस्त्यांचाही अहवाल आयुक्तांनी अद्याप सादर केलेला नाही, त्यामुळे एकप्रकारे या चौकशी अहवालाला विलंब करून अधिकाऱ्याला वाचवण्याचे काम करत आहे, असा आरोप करत रवी राजा यांनी प्रशासन जाणीवपूर्वक विलंब करत असल्याचे सांगितले.
मात्र, यावर भाजपाचे मनोज कोटक यांनी बोलताना, रवी राजा यांनी आरोपांमुळे थेट महापौरांवर शंका उपस्थित होते. प्रशासनाने, ३४ रस्त्यांच्या अहवाल महापौरांना सादर केला. परंतु तो अहवाल महापौरांनी अद्यापही नगरसेवकांना दिलेला नाही. त्यामुळे तो अहवाल कुठे आहे? कुणी दाबून ठेवला आहे, असा सवाल केला आहे. मात्र, यावर अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जी यांनी लवकरात लवकर याबाबतचा अहवाल सादर केला जाईल,असे सांगितले.
३४ रस्त्यांच्या अहवाल सादर केल्यानंतर उर्वरीत २०० रस्ते कामांच्या घोटाळ्याची चौकशी अहवाल हा ३१ जानेवारी २०१८ ला सादर केला जाईल, असे महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी स्पष्ट केले होते. परंतु प्रत्यक्षात या चौकशी समितीने मुदतीवाढीची मागणी केल्यानंतर ही वाढ देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या १५ फेब्रुवारीपर्यंत हा अहवाल आयुक्तांना सादर केला जाणार असल्याचे समजते. या चौकशी अहवालावर सविस्तर विश्लेषण तसेच निष्कर्ष काढण्याचे काम सुरु असून पुढील ७ ते ८ दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे १५ फेब्रुवारीपर्यंत हे या चौकशी अहवालाचे काम पूर्ण होणे अपेक्षित असल्याचे म्हटले जात आहे.
हेही वाचा-
रस्ते घोटाळ्यावर शिवसेना, भाजपाचे मौन
रस्ते सल्लागारांवरही कारवाईची मागणी