भारतामध्ये एखाद्या मुद्द्यावरून आंदोलनं-निदर्शनं झाली की त्या भागातील इंटरनेट सेवा बंद करण्यात येते. याप्रकरणी नुकताच एक अहवाल समोर आला आहे. या अहवालानुसार गेल्या ८ वर्षांत देशभरात तब्बल ३६७ वेळा इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ही माहिती इंटरनेट शटडाऊंस डॉट इन या संकेतस्थळावरून मिळाली आहे.
मुंबई आणि दिल्लीसह देशभरात सुधारीत नागरीकत्व कायद्यावरून निदर्शनं करण्यात आली. गुरुवारी दक्षिण मुंबई, दिल्लीतल्या काही भागांमध्ये आणि आसाममध्ये १० दिवस असा आणखी राज्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली होती. इंटरनेट सेवा बंद करण्याचं कारण म्हणजे पसवल्या जाणाऱ्या अफवा. अफवा पसरू नयेत, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक प्रशासन किंवा राज्य सरकार इंटरनेट बंदीचा आदेश काढतं.
सन २०१२ पासून आतापर्यंत संपूर्ण देशात एकूण ३६७ वेळा इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. २०१२ मध्ये ३ वेळा, २०१३ मध्ये ५ वेळा, २०१४ मध्ये ६ वेळा, २०१५ मध्ये १४ वेळा, २०१६ मध्ये ३१ वेळा, २०१७ मध्ये ७९ वेळा, २०१८ मध्ये १३४ वेळा आणि २०१९ मध्ये ९५ वेळा इंटरनेट बंद ठेवण्यात आले. गेल्या ८ वर्षांत जम्मू काश्मीरमध्ये सर्वाधिक वेळा इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. जम्मू काश्मीरमध्ये सुमारे १८० वेळा इंटरनेट सेवा बंद करण्यात आली.
सन २०१८ मध्ये सर्वाधिक म्हणजे तब्बल १३४ वेळा इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली होती. जगाच्या तुलनेत भारतात इंटरनेट बंद करण्यात आलेल्या घटनांची संख्या सर्वाधिक होती.
त्या वर्षभरात जागतिक स्तरावर खंडित करण्यात आलेल्या इंटनेटपैकी भारतातील संख्या ६७ टक्के होती.