दिवसेंदिवस कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. त्याला नियंत्रणात आणण्यासाठी विविध माध्यमांच्याद्वारे जनजागृती केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून डिपार्टमेंट ऑफ मेडिकल सोशल सर्व्हिस यांच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवारी परळ (पू.) येथील टाटा मेमोरील रुग्णालयाच्या सभागृहात कर्करोग रुग्णांना मार्गदर्शन करण्यात आले.
कर्करोग कशापासून होतो? त्याचे दुष्परिणाम काय? कर्करोग झाल्यास काळजी आणि उपचार कशा पद्धतीने करावेत? यावर विविध तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांना मार्गदर्शन केले. त्याचबरोबर कर्करोगावर मात करण्यासाठी संगीतोपचार पद्धत किती उपयुक्त ठरू शकते, याची उदाहरणे तसेच कर्करोगावर आधारित प्रसंग दाखवणारी जनगृतीपर चित्रफीत उपस्थित रुग्णांना दाखवण्यात आली.
मधुमेह आणि रक्तदाबावर रुग्णांना कायमस्वरुपी म्हणजेच जीवनाचा अंत होईपर्यंत औषधे घ्यावी लागतात. मात्र कर्करोग रुग्णांनी सहा ते आठ महिने व्यवस्थित औषोधोपचार घेतल्यास तो बरा होतो. त्यामुळे नावाने जरी कर्करोग भयंकर वाटला, तरी मधुमेह आणि रक्तदाब हा आजार कर्करोगापेक्षा भयंकर आहे, असे प्रमुख मार्गदर्शक म्हणून कार्यक्रमाला उपस्थित असेलेल्या इंडियन कॅन्सर सोसायटीच्या सहाय्यक संचालक डॉ. वंदना धामणकर यांनी सांगितले. कर्करुग्ण नकारात्मक विचार करत उपचार घेत असतात. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. अशावेळी औषोधोपचार पद्धत देखील कुचकामी ठरते. म्हणून रुग्णांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्यांना आनंद मिळेल अशा कामत गुंतवून ठेवणे गरजेचे आहे. तरच ते आपले ध्येय गाठू शकतात, असा सल्ला देखील धामणकर यांनी दिला. यावेळी एमएसडब्लू अधिकारी किशोर होवाळे, डॉक्टर, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने रुग्ण उपस्थित होते.