पावसाळ्यात मुंबईतील पूरस्थितीचा अचूक अंदाज घेण्यासाठी आयआयटी बॉम्बेने कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित अत्याधुनिक पूरपूर्व इशारा प्रणाली विकसित केली आहे. ही प्रणाली अतिवृष्टी आणि संभाव्य पूरस्थितीचा सुमारे 90 मिनिटे आधी अंदाज वर्तवू शकते. त्यामुळे आपत्कालीन यंत्रणेला तातडीने उपाययोजना करण्यासाठी महत्त्वाचा वेळ मिळणार आहे.
ही प्रणाली रिअल-टाइम हवामान रडार, उपग्रह निरीक्षणे आणि मुंबईतील 60 हून अधिक स्वयंचलित हवामान आणि पर्जन्यमापन केंद्रांमधील माहितीचा वापर करते. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंगच्या मदतीने ही प्रणाली परिसरनिहाय (हायपरलोकल) पावसाचा आणि पूरस्थितीचा अंदाज तयार करते. ही माहिती दर 15 मिनिटांनी अद्ययावत केली जाते.
आयआयटी बॉम्बेच्या इंटरडिसिप्लिनरी प्रोग्राम इन क्लायमेट स्टडीजने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) सहकार्याने ही प्रणाली विकसित केली आहे. या माध्यमातून पूरग्रस्त होण्याची शक्यता असलेले भाग आधीच ओळखणे, आपत्कालीन पथके योग्य ठिकाणी तैनात करणे आणि नागरिकांना वेळेवर इशारा देणे प्रशासनाला शक्य होणार आहे.
ही सुविधा 'मुंबई फ्लड' या संकेतस्थळ आणि मोबाईल अॅपद्वारे उपलब्ध असून, त्यावर थेट पावसाची माहिती, पूराचा अंदाज आणि विविध ठिकाणच्या पाण्याच्या पातळीची माहिती पाहता येते. नागरिकांनाही त्यांच्या परिसरातील पूरस्थितीची माहिती या अॅपवर नोंदवता येणार असून त्यामुळे प्रणालीची अचूकता आणखी वाढण्यास मदत होणार आहे.
संशोधकांच्या मते, या एआय आधारित प्रणालीमुळे पावसाळ्यात मुंबईची आपत्ती व्यवस्थापन क्षमता अधिक मजबूत होईल. पूरस्थितीचा आगाऊ अंदाज मिळाल्याने प्रशासनाला जलद निर्णय घेणे शक्य होईल आणि शहरी पुराचा फटका कमी करण्यास मदत मिळेल.
हेही वाचा
