Advertisement

धक्कादायक: घरगुती मिठामध्ये प्लास्टिकचे कण; आयआयटीचं संशोधन

देशामध्ये वापरल्या जाणाऱ्या बहुतांश मिठामध्ये ‘मायक्रोप्लॅस्टिक’ म्हणजे प्लास्टिकचे सूक्ष्म कण असल्याचं आयआयटी मुंबईतील शास्त्रज्ञांच्या संशोधनातून आढळलं आहे. समुद्राच्या पाण्यात वाहून गेलेल्या प्लास्टिक कचऱ्यातून हे कण मिठामध्ये गेल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला असून मिठाचे उत्पादन करताना त्यात कोणत्याही प्रकारचं प्लास्टिक गेलं नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

धक्कादायक: घरगुती मिठामध्ये प्लास्टिकचे कण; आयआयटीचं संशोधन
SHARES

देशातील अनेक राज्यांमध्ये प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली आहे. यामुळे नागरिकांनी प्लास्टिकच्या वस्तू विशेषतः पिशव्या वापरणं बंद केलं असलं तरीदेखील प्लास्टिकने अद्याप आपली पाठ सोडलेली नाही. ते अजूनही सूक्ष्मरूपात आपल्या जेवणातून पोटात जात आहे. विश्वास बसत नाही ना, पण हे खरं आहे. आयआयटी मुंबईतील शास्त्रज्ञांनी केलेल्या एका संशोधनानुसार आपण वापरत असलेल्या घरगुती मिठामध्ये प्लास्टिकचे सूक्ष्म कण आढळले असून ते आपल्या आरोग्यासाठी धोकादायक आहेत.


समुद्रातील प्लॅस्टिक मिठात

नुकतंच आयआयटी मुंबईतील शास्त्रज्ञांनी यासंदर्भात संशोधन केल असून हे देशातील पहिलं संशोधन आहे. देशामध्ये वापरल्या जाणाऱ्या बहुतांश मिठामध्ये ‘मायक्रोप्लॅस्टिक’ म्हणजे प्लास्टिकचे सूक्ष्म कण असल्याचं त्यांना संशोधनातून आढळलं आहे. समुद्राच्या पाण्यात वाहून गेलेल्या प्लास्टिक कचऱ्यातून हे कण मिठामध्ये गेल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला असून मिठाचे उत्पादन करताना त्यात कोणत्याही प्रकारचं प्लास्टिक गेलं नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. 


६२६ सूक्ष्म कण 

आयआयटी मुंबईतील सेंटर ऑफ एन्व्हायरर्मेंटल सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागातील शास्त्रज्ञांच्या दोन पथकाने हे संशोधन केलं आहे. या संशोधनात त्यांना विविध कंपन्यांच्या मिठाच्या नमुन्यांमध्ये प्लास्टिकचे ६२६ सूक्ष्म कण आढळले. त्यात ६३ टक्के प्लास्टिकचे कण होते, तर ३७ टक्के प्लास्टिकचे तंतू होते. संपूर्ण जगभरात मीठ उत्पादनात भारताचा तिसरा क्रमांक लागत असल्याने आयआयटी मुंबईने केलेल्या या संशोधनाला मोठं महत्त्व आहे.


असे निवडले नमुने 

आयआयटी शास्त्रज्ञांनी या संशोधनासाठी जून आणि सप्टेंबर २०१७ मध्ये मिठाचे नमुने घेतले होते. विविध बाजार आणि सुपरमार्केटमधून ८ विविध मीठ उत्पादक कंपन्यांच्या मिठाचे नमुने घेतले होते. या मिठाचे उत्पादन २०१६ आणि २०१७ दरम्यान झाले असून देशात सर्वाधिक ७७ टक्के मिठाचे उत्पादन करणाऱ्या ६ ब्रॅण्डच्या मिठाचा त्यात समावेश होता.


पोटात ०.११७ मिलिग्रॅम प्लास्टिक

प्लास्टिकचे कण हे पर्यावरणात सर्वत्र पसरलेले आहेत. आता त्यांच्यापासून होणाऱ्या संभाव्य धोक्याचं गणित मांडण्याची गरज शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं प्रत्येक नागरिकाला रोज ५ ग्रॅम मीठ खायला हवं अस सांगितलं आहे. या प्रमाणानुसार भारतातील प्रत्येक नागरिकाच्या पोटात दरवर्षी ०.११७ मिलिग्रॅम प्लास्टिक मिठातून जात आहे. त्याशिवाय अन्य खाद्यपदार्थ आणि हवेमध्येही प्लास्टिकचे सूक्ष्म कण असल्याचं संशोधनात आढळलं आहे.

जगभरातील मीठ प्लास्टिकयुक्त

जगातील अन्य देशांमधील मिठावरही अशाप्रकारचं संशोधन झालं असून गेल्या चार वर्षांत झालेल्या संशोधनांमध्ये चीन, अमेरिका, इंग्लंड, स्पेन, तुर्की, फ्रान्स आदी देशांमधील मिठाच्या नमुन्यांमध्ये प्लास्टिकचे सूक्ष्म कण आणि तंतू आढळले आहेत. आयआयटी मुंबईच्या संशोधनानंतर या देशांमध्ये भारताचाही समावेश झाला असून मिठाच्या नमुन्यांमध्ये आढळलेले प्लास्टिकचे कण हे स्पेन, तुर्कीमध्ये मिठात आढळलेल्या प्लास्टिक कणांप्रमाणेच असल्याचं स्पष्ट झालं आहे


८० टक्के नमुन्यांमध्ये प्लॅस्टिक

प्रयोगशाळेत ८० टक्के नमुन्यांमध्ये प्लास्टिकचे कण आणि तंतू आढळले असून या प्लास्टिकच्या कणांचा आकार ०.५ मिलिमीटर तर तंतूंचा आकार २ मिलिमीटर इतका होता. अगदी ५ मिलिमीटर आकाराचे तंतूही या संशोधनात आढळले. परंतु त्यांची संख्या कमी होती, असं संशोधन अहवालात नमूद करण्यात आलं अाहे. पॉलिथिलीन टेरेप्थॅलेट आणि पॉलिस्टर हे घटक या मिठामध्ये आढळले अाहेत. पाॅलिथिलीन टेरेप्थॅलेट हे प्लॅस्टिकच्या बाटल्या आणि डबे बनविण्यासाठी वापरले जाते.



हेही वाचा -

अबब! १ लाख ५६ हजार प्रति चौ. फूट दराने घराची विक्री

मालाडमधल्या बॉम्बे टॉकीज परिसरातील आगीवर नियंत्रण



 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा