राज्यात कोरोना रुग्णांची संख्या आता आटोक्यात येत आहे. त्यामुळं दिवाळीच्या मुहूर्तावर राज्यातील निर्बंधांबाबत अटी नियम शिथिल होण्याची शक्यता आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी एक मोठी बैठक होणार आहे. कोरोना टास्क फोर्ससोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला टास्क फोर्सचे वरिष्ठ डॉक्टर व अधिकारी उपस्थित राहणार आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोरोना नियमांबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट होत असल्यानं काही प्रमाणात निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. दुकानं, बार, रेस्टॉरंट आणि मॉल्सच्या निर्बंधात काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. सध्या लशीचे २ डोस घेतलेल्या नागरिकांना मॉलमध्ये प्रवेश देण्यात येत आहे. त्याप्रमाणेच लशीचा एक डोस घेतलेल्या लोकांनाही निर्बंधात सूट देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
Maharashtra CM Uddhav Thackeray to chair a meeting of the state's COVID19 Task Force today.
(file photo) pic.twitter.com/Jlv6z9ZkSr— ANI (@ANI) October 18, 2021
सण-समारंभाच्या काळात लोक मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी बाहेर पडतात. मागील वर्षी कोरोना संकटामुळं ऐन दिवाळीत कठोर निर्बंधांमुळं व्यापाऱ्यांना मोठा फटका बसला होता. त्यामुळं यंदा निर्बंधात शिथिलता द्यावी, अशी व्यापाऱ्यांची मानसिकता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर दुकानं, बार, रेस्टॉरंट, मॉल्सच्या वेळेची मर्यादा वाढवली जाण्याची शक्यता आहे. त्याबाबतचा निर्णय काही दिवसांत जारी होण्याची शक्यता आहे. सरकारकडून एक-दोन दिवसांत अधिसूचना जारी करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
कोरोना लशीचा एक डोस घेतलेल्या नागरिकांना लोकलप्रवासास मुभा देण्याची शक्यता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली होती. याबाबतही टास्क फोर्सच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. लशीचे २ डोस घेतलेल्यांना सध्या लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे.
या निर्णयावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. सध्या मुंबईच्या रुग्णसंख्येतही झपाट्याने घट होत आहे. काल मुंबईत शून्य करोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती. त्यामुळं ज्यांचा एक डोस झालेला आहे त्यांनाही काही नियम अटींवर प्रवासाची परवानगी मिळेल अशी चर्चा आहे.