इर्शाळवाडी येथे दरड कोसळल्याने अनेक घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. या दुर्घटनेत आतापर्यंत२२ जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. अनेक लहान मुलं या दुर्घटनेत अनाथ झाली आहेत.
इर्शाळवाडीच्या अनाथ झालेल्या मुलांच्या शिक्षण आणि पालनपोषणाची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारली आहे. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनतर्फे मुलांच्या शिक्षणाची आणि पालनपोषणाची जबाबदारी घेण्यात आलीये.
शिक्षणासाठी आश्रमशाळा किंवा अन्यत्र असलेल्या मुलांनी आपले आई-वडील गमावले. दोन वर्षांपासून १४-१५ वर्षे वयोगटातील मुले अनाथ झाली. या मुलांच्या वाट्याला आलेल्या वेदना, दुःख सांत्वनापल्याड आहेत. त्यांच्या डोळ्यासमोर अंधार आहे. त्यांच्या आयुष्यात या कठीण आणि परीक्षेच्या काळात पाठीशी ठाम उभे राहण्याची गरज आहे.
हीच बाब लक्षात घेऊन इर्शाळवाडीतील सर्व अनाथ मुलांच्या पाठीवर आधाराचा हात ठेवण्याचे डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनने ठरवले आहे.
काळाने येथील मुलांवर मोठा आघात केला असला तरी त्यांचे आयुष्य सावरून जगण्याचे बळ देण्याचा निश्चय करण्यात आला आहे. या मुलांच्या शिक्षण आणि पालनपोषणाची जबाबदारी फाउंडेशनकडून घेण्यात येत आहे.
राज्यातील दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करून त्यांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.