कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या पाचव्या टप्प्यातील (Lockdown 5.0) देशव्यापी लाॅकडाऊन येत्या ३० जून रोजी संपत आहे. असं असताना महाराष्ट्रातील लाॅकडाऊन पुन्हा एकदा वाढवण्यात येणार की अनलाॅक होत राहणार, असे प्रश्न सध्या राज्यातील सर्वसामान्यांच्या मनात उपस्थित होत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून रविवार २८ जून रोजी जनतेशी पुन्हा एकदा संवाद साधला.
धोका टळलेला नाही
या संवादादरम्यान उद्धव ठाकरे यांनी अतिशय स्पष्टपणे सर्वसामान्यांच्या मनात असलेल्या प्रश्नांची उत्तरं देत गोंधळू दूर करण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, येत्या ३० जून रोजी लॉकडाऊनची मुदत संपत आहे. त्यामुळे पुढं काय? लॉकडाऊन उठेल की नाही, याची जनतेला उत्सुकता लागलेली आहे. पण संकट टळलेलं नाही. धोका टळलेला नाही. त्यामुळे स्पष्टच सांगायचं झालं तर ३० जूननंतर लॉकडाऊन उठणार नाही.
हेही वाचा - Unlock Maharashtra: पुन्हा लाॅकडाऊन की अनलाॅक?, राजेश टोपे म्हणाले…
CM Uddhav Balasaheb Thackeray addressing the State https://t.co/B1YyHk36XR
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 28, 2020
घराबाहेर पडू नका
परंतु सगळं काही असंच सुरु राहणार का? तर त्याचंही उत्तर नाही असंच आहे. लॉकडाऊन जरी मागे घेण्यात येणार नसला तरी राज्यातील नागरिकांची गैरसोय होऊ नये आणि अर्थचक्र गतीमान व्हावं म्हणून आपण अनेक गोष्टीत शिथिलता आणत आहोत. आपण एक एक पावलं टाकत पुढं जाणार आहोत. पण त्याचा अर्थ धोका टळला आहे, या भ्रमात राहू नका. सध्या आपली अवस्था कात्रीत सापडल्यासारखी झाली आहे. हळूहळू सर्व सोयी सुरू करायच्या म्हणजे घराबाहेर बिनधास्तपणे पडायचं असं नाही. कारण बाहेर करोना आ वासून बसलाय. त्यामुळे अनावश्यक गोष्टीसाठी घराबाहेर पडू नका, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं.
तर पुन्हा लाॅकडाऊन
कुठेही गर्दी करू नका. ज्या भागात गर्दी होईल, त्या भागात पुन्हा पूर्वीसारखाच कडक लॉकडाऊन करण्यात येईल. त्यामुळे तुम्हाला पुन्हा लॉकडाऊन हवाय का? जर नको असेल तर मास्क लावणं, हँड सॅनेटायझर वापरणं, हात धूत राहणं, गरज नसेल तर घराबाहेर न पडणं, उगाच गर्दी न करणं हे उपाय पाळावेच लागतील. हे नियम पाळले नाहीत तर नाईलाजाने पुन्हा लॉकडाऊन पुन्हा करावा लागेल, असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
मी तुम्हाला सतत काळजी घेण्यासाठी सांगत असतो. तुम्हाला वाटत असेल हे काय काळजी काळजी करतात. कारण आपलं सरकार काळजीवाहू सरकार नाही. हे सरकार तुमचं आहे. महाराष्ट्राची काळजी घेणारं सरकार आहे. धोक्यापासून सावध करणारं सरकार आहे, असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले.
हेही वाचा - बोरिवली, कांदिवली, दहिसरमध्ये धारावी पॅटर्न